Breaking News

भविष्यात पाण्याची समस्या आणखी गंभीर होणार - अमिताभ कांत

नवी दिल्ली, दि. 06, सप्टेंबर - पाणी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भविष्यात हा मुद्दा आणखी गंभीर होणार असून याच मुद्यावर निवडणुकीत राजकारण केले जाईल,  असे मत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज येथे व्यक्त केले. येथे आयोजित जल संमेलनात ते बोलत होते.
जे सरकार पाण्याचे योग्य नियोजन करणार नाही त्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागेल. यासाठी पाणी हा मुद्दा केंद्रस्थानी असला पाहिजे. उत्तर  भारतासह पंजाब, हरियाणा, दिल्ली या राज्यांत पाणी साठवणुकीचे कोणतेही नियोजन नाही. यामुळे गेल्या दशकभरात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले, असेही  अमिताभ कांत म्हणाले.
सिंचनासाठी वापरल्या जाणा-या वीजपुरवठ्यासाठी ग्रामीण व शहरी भागांतील फिडर यंत्रणा वेगवेगळी असली पाहिजे. देशातील काही भागांत आधीपासूनच पाण्याची  कमतरता आहे. आता आणखी गतीने पाण्याची समस्या भेडसावत आहे. आता भविष्यात पाण्याच्या नियोजनासाठी काय काय उपाययोजना आहेत हेच सर्वांसमोरील  आव्हान असणार आहे, असेही अमिताभ कांत म्हणाले.