Breaking News

आ. जगतापांची गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी जनआंदोलन - शेलार

अहमदनगर, दि. 03, सप्टेंबर - सत्ता आणि संपत्तीचा वापर जनतेच्या कल्याणासाठी करण्याऐवजी सामान्यांचा आवाज दाबून आ. राहुल जगताप आणि त्यांच्या  हस्तकांनी तालुक्यात दहशतवादाला सुरुवात केल्याचा गंभीर आरोप करीत हस्तकांना आवर न घातल्यास त्यांची ही गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी तीव्र जनआंदोलन  छेडू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेद्वारे दिला.जेष्ठ कार्यकर्ते राजाराम जठार यांच्यावर  विसापूर येथील राहत्या घरात घुसून हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (दि.31) रात्री घडली. या घटनेचा शेलार यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला. यावेळी ते बोलत  होते. भाऊसाहेब गोरे, संजय आनंदकर आदी यावेळी उपस्थित होते. शेलार म्हणाले, आ. राहुल जगताप यांनी आमदार झाल्यापासून आपल्या कुटुंबातील आणि  पिंपळगावपिसा परिसरातील काही गुंडांना संरक्षण दिले आहे. आ. जगताप यांच्या हस्तकांची ही ’टोळी’ लोकशाही मार्गाने काम करणार्‍या सामान्यांचा आवाज  दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. गुरुवारी (दि.31) राजाराम जठार यांच्यावर आमदार राहुल जगताप यांचे पुतणे अजिंक्य प्रमोद जगताप आणि सुजित सुनील इथापे  यांनी 10 ते 15 जणांना सोबत घेऊन जठार यांच्या विसापूर येथील राहत्या घरात घुसून हल्ला करून थेट खुनाची धमकी दिली. याप्रकरणी राजाराम जठार यांनी  बेलवंडी पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे.