लोकसहभागातून केली गावाची स्वच्छता!
सिंदखेड राजा तालुक्यातील वाघजाई गावातील नागरिकांचा स्तुत्य उपक्रम
बुलडाणा, दि. 25, सप्टेंबर - ग्रामीण भागामधील गावातील नागरिक स्वतःचे घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणार्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे. त्यामूळे सिंदखेड राजा तालुक्यातील वाघजाई या गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गांवाची नाले सफाई, आपल्या घरासमोरील कचरा, सार्वजनिक ठिकाणची साफसफाई केली आहे.संतगाडगेबाबा व तुकडोजी महाराजांनी सांगितल्या प्रमाणे देव - देवतांच्या पूजेबरोबरच श्रमातून भक्ती करा. गाव चांगले ठेवा. त्यामुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल, ही शिकवण त्यांनी युवकांना व नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणार्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे ज्यांचे आरोग्य मान, पर्यायाने जीवन स्तर उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे. त्यामुळे शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, समृद्ध ग्राम योजना सुरू केल्या आहेत. त्याचा वाघजाई या गावातील नागरिकांनी सक्रीय व सातत्यापूर्ण उत्स्फुर्त सहभाग घेवून गावाची साफसफाई केली आहे. त्यामुळे गांवातील रोगराईला आळा बसण्यास मोठा फायदा होणार आहे. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होतात. त्यामुळे घराची व परिसराची स्वच्छता हे उत्तम आरोग्याचे महत्वाचे अंग आहे.स्वच्छता राखण्याची जबाबदारीही स्वत: पासून सुरु करावी लागती. यावेळी नागरिकांनी शपथ घेतली की ,मी स्वत: ही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आठवडयातून किमान 1 तास स्वच्छता करण्याचा संकल्प वाघजाई या गांवातील नागरिकांनी केला आहे ,व त्याची सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे मी स्वत: ही घाण करणार नाही व दुसर्यालाही घाण करू देणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहे. असे त्यांनी सांगितले.यावेळी भिकाजी सानप, भगवान सानप, बद्री सानप, विकास सानप, चंद्रहास सोसे, हरिभाऊ सानप, भास्कर बोरुडे, दत्तू बोरुडे, विक्रीम झोटे, मंगेश बोरुडे, संजय सानप, मंगेश कोटमीरे, गणेश डोईफोडे, बबन बोरुडे, कैलास सानप, रामप्रसाद झोटे, गणेश काटकर, भगवान सानप, दत्तू निकाळजे, श्रीकृष्ण सानप इत्यादी ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतला होता.