Breaking News

पुण्याला पाणीपुरवठा करणा-या खडकवासला धरण साखळीतून विसर्ग सुरू

पुणे, दि. 27, ऑगस्ट - शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने या धरणातून पुन्हा मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला  आहे. धरणातून शनिवारी दुपारी 2 पासून 856 क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर पानशेत धरणही 100 टक्के भरल्याने धरणातून खडकवासला धरणात 990  क्यूसेकने पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. दरम्यान, शुक्रवारी रात्रभर या धरणसाखळी प्रकल्पातील खडकवासला, पानशेत,  वरसगाव आणि टेमघर धरणात मुसळधार पाऊस झाल्यानंतर शनिवारी दिवसभर मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर शनिवारी सायंकाळी सात नंतर पुन्हा  पावसाला सुरूवात झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या धरणसाखळीमधील चारही धरणांमध्ये चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला व पानशेत धरण 100 टक्के भरलेले असून सर्वात  मोठे धरण असलेले पानशेत धरणही 92 टक्के भरले आहे. तर टेमघर धरणाचा पाणीसाठा 43 टक्के झाला आहे. पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या  माहितीनुसार, या चारही धरणांमध्ये 26.02 टीएमसी ( 90 टक्के) पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पानशेत आणि खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात  करण्यात आली असून रात्री पावसाचा जोर वाढल्यास हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी पाच पर्यंत खडकवासला धरणात 2  तर पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे.