Breaking News

कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असले तरी केरळच्या विकासासाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार - रामदास आठवले

नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सर्व 125 कोटी भारतीयांच्या हितासाठी कार्यरत असून मोदी यांचे सरकार  राजकारण नाही तर विकासकारण करणारे सरकार आहे. त्यामुळे केरळच्या विविध विकास योजनांसाठी प्रस्ताव पाठवा; केरळमध्ये जरी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य  सरकार असले तरी कोणताही भेदभाव न करता केंद्र सरकार केरळच्या विकासासाठी भरीव मदत करेल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय  सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. कालीकत येथून जवळ असणार्‍या मलप्पुरमच्या पुनानी येथे महिला आणि बाल रुग्णालयाचे उदघाटन केंद्रीय  राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर अध्यक्षस्थानी केरळ विधानसभेचे सभापती रामकृष्णन ; केरळ च्या  आरोग्यमंत्री शैलजा टीचर; जिल्हा अधिकारी मीना; पुनानी नगर परिषदेचे अध्यक्ष पी. टी. मोहंमद कुणी आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते .
यावेळी येथे अपंगांच्या उपचारासाठी विशेष असलेल्या कॅम्पचे सुद्धा रामदास आठवले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले .
देशात दिव्यांगांची एकूण लोकसंख्या 13 टक्के आहे. त्यांच्यासाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये असलेल्या 3 टक्के अरक्षणात वाढ करून 4 टक्के आरक्षण केंद्र सरकारने  केले आहे. दिव्यांगाच्या हितासाठी तसेच महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठी सरकारी यंत्रणेने दक्ष राहून सतत प्रबोधन करीत राहिले पाहिजे.महिला आणि  बालकांच्या आरोग्यासाठी स्वतंत्रपणे रुग्णालय उभारली जात असल्याबद्दल रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त करून अधिक प्रमाणात महिला आणि बालकांच्या  आरोग्याबाबत सरकार बरोबरच महिलांनी ही जागृत राहण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले .
कालीकत; मलप्पूरम या जिल्ह्यांच्या या भागाला केरळ मध्ये मलबार असे नाव आहे . तो धागा पकडून रामदास आठवले यांनी मुंबईत सुद्धा एक मलबार हिल आहे.  मुंबईतील मलबार हिल सारखाच केरळ चा हा मलबार भाग विकसित आणि महत्वपूर्ण करण्यासाठी केरळ सरकार ने पुढाकार घ्यावा असे ना रामदास आठवले  म्हणाले.