Breaking News

कोरेगाव तालुक्यात शेतकरी गट स्थापन करा : सिंघल

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी) : राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून अनेक कंपन्यांबरोबर करार केला असून ज्या भागात जे उत्पादन  येते, तेथील शेतकर्‍यांचे गट तयार करुन ते त्या कंपनीशी जोडून दिले जातील. त्यातून दलालांची साखळी मोडून उत्पादन खर्चावर आधारीत भाव शेतकर्‍यांना  मिळणार आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्यात आलं उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात शेतकरी गट स्थापन करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल  यांनी आज केले.
कोरेगाव तालुक्यातील वाठार येथे आयोजित केलेल्या महाराजस्व अभियानात जिल्हाधिकारी सिंघल बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी  अधिकारी आनंद भंडारी, कोरेगाव पंचायत समितीचे सदस्य राजाभाऊ जगदाळे, उपविभागीय अधिकारी किर्ती नलावडे, तहसीलदार स्मिता पवार, जिल्हा परिषदेचे  सदस्य भिमराव पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
महाराजस्व अभियान हे जनतेला विविध प्रकारचे दाखले, विविध योजनांचे लाभ तुमच्या गावात येवून देण्याची योजना आहे. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील संबंधित  विभागाचे अधिकारी दिवसभर आपापले दालन उभे करुन तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करुन तिथल्या तिथे तुमच्या आधार कार्ड पासून ते तुमच्या रेशनकार्ड  पर्यंतचे सर्व प्रकारचे दाखले या एक दिवसाच्या कँपमध्ये देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली जाते. आज वाठार पासून आम्ही या महाराजस्व अभियानाची सुरुवात  केली असून, जिल्ह्यात विविध तालुक्यातील गावात असे एक दिवशीय कँप घेवून जास्तीत-जास्त जनतेला त्यांचे विविध प्रकारचे दाखले त्यांच्या गावात मिळावेत,  त्यांचे जिल्हा आणि तालुका कचेरीतील हेलपाटे वाचावेत आणि त्यांना तात्काळ सेवा मिळावी हा या महाराजस्व अभियानामागचा मुळ हेतू असल्याचे जिल्हाधिकारी  श्‍वेता सिंघल यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील अर्ध्या भागातील शेती व्यवसाय हा  पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यामुळे तुमच्याकडून जे उत्पादन घेतले जाईल, त्याला कृषी विभागाच्या  वतीने सर्व सेवा पुरविल्या जातील, असेही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांनी सर्वांना आश्‍वासन दिले.
यावेळी शाळेतील विद्यार्थांना विविध दाखले दिले. काही जणाना शिधा पत्रिका, विद्युत मीटर, पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल मंजूरी पत्र, रोहयो जॉबकार्ड,  राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळालेल्या बचत गटाचा सन्मान, चार शेतकर्‍यांना टॅ्रक्टरचे वाटप तर एका शेतकर्‍याला रोटर देण्यात आले. पवारवाडी ग्रामस्थानी वॉटर  कप मध्ये केलेल्या कामाचा गौरवही यावेळी करण्यात आला. दिवसभर शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने महिलांसाठी तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले  होते. भिमराव पाटील, राजाभाऊ जगदाळे, आनंद भंडारी, किर्ती नलावडे, स्वाती पवार यांनी आपली मनोगत व्यक्त केली. सोपान महाराज यांनी ग्रामस्थांच्या वतीने  आभार मानले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिंघल यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण केले.