Breaking News

विचार व तत्त्वांची लढाई यापुढेही सुरूच राहील - मीरा कुमार

नवी दिल्ली, दि. 21, जुलै - ज्या विचारधारा व तत्त्वांची लढाई लढण्यासाठी राष्ट्रपतीपदाची निवडणूक मी लढवली होती ती लढाई संपलेली नाही, तर ती यापुढेही  सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार व लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांनी  येथे व्यक्त केली.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या रामनाथ कोविंद यांचे मीरा कुमार यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत पाठिंबा देणा-या व माझ्यावर विश्‍वास ठेवणा-या  विरोधी पक्षांच्या नेत्यांचे, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व सर्व देशवासियांचे मी आभार व्यक्त करते , असे मीरा कुमार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
कोविंद यांच्यावर आता घटनेच्या रक्षणाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडावी या साठी त्यांना शुभेच्छा. सामाजिक न्याय, पारदर्शकता,  धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जाती-पातीचा अंत व्हावा, असे सर्वांना वाटते. आपण नेहमीच या विरोधात लढत असतो. आपण सर्वांनी मला नेहमीच सहकार्य  केले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, असे मीरा कुमार म्हणाल्या.