Breaking News

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करणार

। केंद्राचे कामगार व रोजगार राज्य मंत्री बंडारु दत्तात्रय

अहमदनगर, दि. 01 - पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी येथील जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करु, असे आश्‍वासन केंद्राचे कामगार व रोजगार  राज्य मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी दिले. 
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 व्या  जयंतीचा कार्यक्रम आ. गणपतराव  देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उत्तरप्रदेशचे पशुसंवर्धन, लघुसिंचन, मत्स्य व्यवसाय मंत्री प्रा. एस.पी. सिंग बघेल,  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे, राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री भीमराव धोंडे, शिवाजीराव कर्डिले, रामहरी रुपनवर, नारायण पाटील, रामराव वडकुते,  मोनिका राजळे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, रमेश शेंडगे, विजय मोरे, गोविंद केंद्रे, कविवर्य ना.धों. महानोर, पुण्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते आदी  उपस्थित होते.
श्री. बंडारु  दत्तात्रेय म्हणाले, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे चौंडी हे जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दृष्टीने राज्यातील शिष्टमंडळासह केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल. अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामगारांची संख्या आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने अहमदनगर येथे  शंभर खाटांचे रुग्णालय सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली. याशिवाय या भागातील विडी कामगारांच्या घरकुलांचे स्वप्न साकार व्हावे, त्यासाठीच्या अनुदानात भरघोस वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे, त्यामुळे मेंढीपालन, लोकरनिर्मिती यासाठी केंद्रीय मंडळाकडून प्रशिक्षण आणि मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले.
उत्तरप्रदेशचे पशुसंवर्धन, लघुसिंचन, मत्स्य व्यवसाय मंत्री प्रा. एस.पी. सिंग बघेल यांनी आपल्या भाषणात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच इतिहास हा लोककल्याणाचा असल्याचे सांगितले. मंदिर जीर्णोद्धारासह विविध सामाजिक कामे करुन त्यांनी जनमानसात स्थान मिळवले. त्यामुळे या समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींनी उत्तम राज्यकारभाराचा आदर्श सर्वांसमोर घालून दिला. सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले, असे नमूद करुन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या. अध्यक्षीय समारोप माजी मंत्री गणपतराव देशमुख यांनी केला.
राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री व स्वागताध्यक्ष   प्रा.शिंदे यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थळ  ही प्रेरणा देणारी भूमी असल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चौंडी हे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दृष्टिने प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.  यावेळी प्रा. शिंदे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींची प्रतिमा, धोंगडी आणि काठी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांनी प्रारंभी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी भेट देऊन शिल्पसृष्टीची  पहाणी केली.  कार्यक्रमास राज्याच्या विविध भागातून अनेक भाविक उपस्थित होते.