Breaking News

मिठी नदी भरती आणि पावसापासून सुरक्षित - रामदास कदम

मुंबई, दि. 28 - मिठी नदीच्या खोलीकरणाचे व रूंदीकरणाचे काम पुर्ण झाले असून, पुढील शंभर वर्षासाठी मिठी नदी पूर आणि पावसापासून सुरक्षित असल्याची  माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज दिली. मंत्रालयात आज मिठी नदीच्या कामकाजासंदर्भात श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी श्री. कदम बोलत होते. या बैठकीस मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, मुंबई उपनगर जिल्ह्याचे  उप-जिल्हाधिकारी सतीश बागल, एमएमआरडीएचे प्रकल्प संचालक एस. सी. देशपांडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे डॉ. सोनटक्के, मधुकर लाड आदीसह संबंधित  अधिकारी उपस्थित होते.
मिठी नदी स्वच्छता व संवर्धनासंदर्भातील सर्व कामांचा आढावा यावेळी श्री. कदम यांनी घेतला. पावसाळ्यापुर्वीची मिठी नदीसंदर्भातील सर्व स्वच्छतेची कामे झाली  असून, पुढील कामांची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी संबंधीत अधिकार्‍यांनी केले. श्री. कदम म्हणाले की, मिठी नदीचे स्वच्छताकरण व  सौंदर्यीकरणासंदर्भातील पहिल्या टप्प्याचे काम तातडीने सुरू करावे. नदीच्या दोन्ही बाजूस पाईप लाईनद्वारे सांडपाणी सोडून त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात यावी.  मिठी नदीच्या परिसरातील 12 हजारांपैकी 10 हजार झोपड्या हटविण्यात आल्या असून, उर्वरित झोपड्या हटविण्याचे काम तातडीने करावे, असे निर्देशही श्री. कदम  यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.
मिठी नदी मुंबई शहरातील एक उल्लेखनीय पर्यटन स्थळ करण्यासंदर्भात शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे श्री.  कदम यांनी सांगितले. याचबरोबर मुंबईतील पोयसर, दहीसर आणि ओशिवरा नद्यांचा स्वच्छताकरण प्रस्ताव तातडीने सादर करून, त्यासंदर्भातील कामांनाही गती  देण्यात यावी असेही श्री. कदम यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना सांगितले.