Breaking News

कुंबळे-कोहली वादावर गांगुलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

कोलकाता, दि. 29 - अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बराच वादंग निर्माण झाला आहे. अनिल कुंबळे आणि विराट कोहली  यांच्यामधील वादाबाबत आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं पहिल्यांदा आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘कुंबळे-कोहली यांच्यातील मतभेद हे परिपक्वपणे  दूर करण्याची गरज होती. चॅम्पियन्स ट्राफीतील पराभवानंतर अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील मतभेद हे चर्चेनं सोडवता आले असते.’ असंही यावेळी  गांगुली म्हणाला.गांगुली पुढे असंही म्हणाला की, ‘कुंबळे आणि कोहली यांच्यातील वाद अतिशय संयमीपणे हाताळणं गरजेचं होतं. हे प्रकरणं योग्य पद्धतीनं सोडवता  आलं असतं.’ क्रिकेट सल्लागार समितीतील तीन सदस्यांमध्ये गांगुलीचाही समावेश आहे. त्यामुळे प्रशिक्षक निवडीमध्ये गांगुलीचा सक्रिय सहभाग आहे.
प्रशिक्षकपदाचा राजीनामा देताना कुंबळेनं थेट कोहलीवर निशाणा साधला होता. ‘माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर कर्णधाराचा आक्षेप होता.’ असं त्यानं आपल्या  राजीनामा पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर याबाबत काहीही बोलण्यास विराट नकार दिला होता.
‘माझ्यासाठी ड्रेसिंग रुममधील गोष्टी फारच महत्त्वाच्या आहे, ज्या मी कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक करु शकत नाही.’ असं विराट म्हणाला होता. दरम्यान, आता  प्रशिक्षक निवडीत एक नवं वळण आलं आहे. कारण की, आता टीम इंडियाचा माजी संचालक रवी शास्त्रीनं प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. याआधीही रवी शास्त्रीनं  अर्ज दाखल केला होता. त्यावेळी मात्र, कुंबळेला निवडण्यात आलं होतं. तेव्हा रवी शास्त्रीनं सार्वजनिकरित्या गांगुलीवर आरोप केला होता. की, ‘गांगुलीनेच मला  प्रशिक्षकपदापासून दूर ठेवलं होतं.’ त्यामुळे आता यावेळेस नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.