Breaking News

क्रिकेटच्या मैदानात भारत-पाक पुन्हा भिडणार!

नवी दिल्ली, दि. 29 - नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानकडून सपाटून मार खावा लागला. यामुळे लाखो  भारतीय क्रिकेट प्रेमींची घोर निराशा झाली. पण क्रिकेटच्या मैदानात पुन्हा हे दोन संघ एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. पण यावेळी फरक फक्त इतकाच असेल,  की तो म्हणजे यावेळी भारतीय पुरुष संघाऐवजी महिला क्रिकेट संघ पाकिस्तानविरोधात उभे ठाकणार आहेत. सध्या महिला विश्‍व चषकाचे समाने इंग्लंडमध्ये सुरु  असून, आयसीसीच्या सर्वात मोठ्या टूर्नामेंटमध्ये महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली आहे. येत्या 2 जुलै रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान दरम्यान डर्बीच्या  काऊंटी ग्राऊंडवर सामना होणार आहे.
या सामन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पराभवाचे उट्टे भारतीय महिला क्रिकेट संघ काढेल, अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. त्यामुळे लाखो  भारतीय क्रिकेट प्रेमींनी भारतीय महिला क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या संघाला धुळ चारावी, यासाठी प्रार्थना करत आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेट  संघात 2005 ते 2017 दरम्यान 9 एकदिवसीय सामने झाले आहेत. यात पाकिस्तानला सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे 2 जुलै रोजी होणार्‍या सामन्यात  काय होईल याकडे सार्‍यांचे लक्ष लागून आहे.
सध्या मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आयसीसीच्या या टूर्नामेंटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मिताली राजने प्रत्येक सामन्यात संयमाने निर्णय  घेतल्याने, भारतीय संघाने यश विजय मिळवला आहे. त्यामुळे आगामी सामन्यातही तिचा हाच संयम पाहायला मिळेल, अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे. याशिवाय  भारताकडे झूलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधनासारखे सर्वोत्कृष्ठ खेळाडू ही भारतीय संघाची जमेची बाजू आहे. या सर्वांनी आतापर्यंत प्रत्येक सामन्यात  भारताला विजय मिळवून दिला आहे.