Breaking News

बळीराजाच्या संपाचा दुसरा दिवस, दूध, भाजीपाल्याचा तुटवडा

मुंबई, दि. 02 - मुख्यमंत्र्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर राज्यातील शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. शहरांची नाकाबंदी करुन  आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा शेतकर्‍यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आजपासून अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसंच  महागाईचीही टांगती तलवार शहरवासियांच्या डोक्यावर आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत सात दिवस संप चालूच ठेवण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. संपूर्ण कर्जमाफी,  स्वामिनाथन आयोग लागू करावा, साताबारा कोरा करावा अशा शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
शेतकरी संपाचा फटका बाजार समित्यांना बसल्याची माहिती समोर येते आहे. नवी मुंबईतल्या वाशी एपीएमसीत आणि कल्याण एपीएमसीमध्ये फळं आणि भाजीपाला  घेऊन येणार्‍या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नवी मुंबईत जिथे दररोज 500 गाड्यांची आवक होते, तिथे आज फक्त दीडशे गाड्यांची आवक झाली आहे.  तर कल्याणमध्ये सकाळपासून भाजीचा एकही ट्रक आलेला नाही. त्यामुळे कल्याणमधील व्यापारी कालच्याच उरलेल्या भाज्या विकत आहेत. याशिवाय, पुणे कृषी  उत्पन्न बाजार समितीत केवळ 10 टक्के आवक झाली आहे. बाजार समितीत फक्त 110 गाड्या आल्या आहे.
पुणे शहरात तर गुरुवारपासूनच (1 जून) दुधाचा तुटवडा जाणवायला लागला आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे दुधाची आवकच झाली नाही. त्यामुळे दूधविक्रेत्यांनी  या संधीचा फायदा घेत दर वाढवले आहेत. पुण्यात 56 रु. लीटर असलेलं म्हशीचं दूध 80 रु. प्रतिलीटरनं विकलं जातं आहे. तर गायीचं 40 रु. लीटरचं दूध 60  रुपये प्रतिलीटर दराने विकलं जातं आहे. दुधाचे दर जरी वाढले असले तरी दूध खरेदीसाठी पुणेकरांनी मात्र दुकानांबाहेर लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.  तर शेतकरी संपावर असल्याने मुंबईतील दूध संकलन कमी झालं आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात उद्यापासून दुधाची टंचाई होऊ शकते. त्यासाठी गुजरातहून  मोठ्या प्रमाणवर दुधाची आवक होणार आहे.
शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला. हा संप मागे  घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकर्‍यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव  दिला. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता 1 जूनपासून शेतकर्‍यांनी दूध  आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.