Breaking News

शेतकरी संपावर : येवल्यातील आंदोलनात एका शेतकर्‍याचा मृत्यू

नाशिक, दि. 02 - शेतकर्‍यांच्या संपामध्ये आज एका शेतकर्‍याचा जीव गेला आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील किसान क्रांती मोर्चात  सहभागी असलेल्या अशोक मोरे यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर आंदोलन सुरु असताना पोलीस आणि  शेतकर्‍यामध्ये झटापट झाली. यावेळी लाठीचार्ज सुरु झाला. त्यानंतर मोरे हे पळत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं उपचारापूर्वीच  निधन झालं.
राज्यभरात 1 जूनपासून शेतकर्‍यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार  नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकर्‍यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकर्‍यांनी संपावर जाणार असल्याचं  सांगितलं. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.
शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता. हा संप मागे  घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकर्‍यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा  प्रस्ताव दिला. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता एक जूनपासून  शेतकर्‍यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.