पाच महिन्यात मराठवाड्यात 361 शेतक-यांच्या आत्महत्या
औरंगाबाद, दि. 02 - मराठवाड्यातील दुष्काळ, नापिकी आणि डोक्यावरील वाढत जाणा-या कर्जाच्या डोंगरामुळे शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये चिंताजनक प्रमाणात वाढ होत आहे. 1 जानेवारी ते 28 मे 2017 यादरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत तब्बल 361 शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 68 शेतक-यांनी आत्महत्या केली. त्याखालोखाल नांदेड जिल्ह्यात आत्महत्या झाल्या. हिंगोली जिल्ह्यात सर्वांत कमी 22 शेतक-यांनी आत्महत्या केल्या. गेल्या चार ते पाच वर्षांपासून मराठवाड्यात कमी पर्जन्यमान होत असल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे हजारो हेक्टर जमीन कोरडवाहू झाली आहे. कित्येक ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीतून आर्थिक उत्पन्न मिळणे अवघड झाल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. बहुतांश शेतक-यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे मृत्यूला कवटाळले. मराठवाड्यात 1 जानेवारी ते 28 मे दरम्यान 361 शेतक-यांनी आत्महत्या केल्या. शेतक-यांच्या आत्महत्येसंबंधी जिल्हास्तरावर जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने यातील 231 प्रकरणे पात्र ठरविले आहेत तर 44 प्रकरणे अपात्र घोषित केले. तसेच 86 प्रकरणांमध्ये कागदपत्रांच्या तपासणीसाठी प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला यामध्ये एक लाखाची मदत केली जाते.
