Breaking News

‘जेईई’त पास होणे सोपे मात्र बिहारच्या 12वीच्या परिक्षेत पास होणे कठीण ?

पाटणा, दि. 02 - अभियांत्रिकी साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षेत (जेईई) पास होणे सोपे झाले आहे. मात्र बिहार शिक्षण मंडळाच्या 12 वी च्या परिक्षेत पास होणे  कठीण झाले आहे, असे दिसून येत आहे. यामुळे नैराश्याने अनेक मुलांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. 
विवेक कुमार हा विद्यार्थी जेईई सारख्या कठीण परिक्षेत 360 पैकी 109 गुण मिळवून पास झाला आहे. त्यामुळे त्याला नावाजलेल्या संस्थेत प्रवेश मिळाला. मात्र  त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. 12 वीत जेईईसाठी महत्वाच्या विषयात नापास झाल्यामुळे त्याचा भ्रमनिरास झाला. त्याला भौतिकशास्त्रात 60 पैकी 12  तर रसायनशास्त्रात 60 पैकी 17 गुण मिळाले. फक्त कुमारबरोबरच असे झाले नाही तर असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी जेईईत यश संपादन केले आहे मात्र 12  वीत उत्तीर्ण होण्यात त्यांना अपयश आले आहे. मला पेपर चांगला गेला होता. मी नापास कसा झालो हेच कळत नाही. मी पास होईन याची खात्री आहे, असे कुमार  याने सांगितले. शुभम शर्मा या विद्यार्थ्यालाही जेईई परिक्षेत यश मिळाले. मात्र 12 वीच्या परिक्षेत त्याला भौतिकशास्त्रात 60 पैकी 6 गुण मिळाले आहेत. यंदा जेईई  परिक्षेत उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी 12 वीच्या परिक्षेत नापास झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.