Breaking News

‘पतंजली’ची अनेक उत्पादने गुणवत्ता चाचणीत अयशस्वी

नवी दिल्ली, दि. 31 - योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीची अनेक उत्पादने गुणवत्ता चाचणी पार करण्यात अयशस्वी ठरली आहेत. उत्तराखंडमधील एका प्रयोगशाळेत पतंजलीच्या अनेक उत्पादनांची गुणवत्ता चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पतंजलीची 40 टक्के उत्पादने मानकाप्रमाणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या अहवालात हे सिद्ध झाले आहे. ‘वर्ष 2013 ते 2016 दरम्यानपतंजलीच्या उत्पादनांचे 82 नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 32 उत्पादने गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरली आहेत. यात पतंजलीच्या ‘दिव्य आवळा रस’ आणि शिवलिंगी बीज’ या उत्पादनांचा समावेश आहे.
मागील महिन्यात पतंजलीच्या आवळा ज्यूसवर बंदी घालण्यात आली होती. पश्‍चिम बंगालमधील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत पतंजलीची उत्पादने अयशस्वी ठरल्यामुळे लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली होती.
या आवळा रसमध्ये ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी प्रमाणात पीएच आढळून आले . पीएच चे प्रमाण 7 टक्क्यापेक्षा कमी असल्यास पित्त आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्धभवत असल्याचे सांगण्यात येत आहे. असाच काहीसा अहवाल शिवलिंगी बीजाबाबत आलेला आहे. त्यावेळी शिवलिंगी बीज हे एक नैसर्गिक बीज आहे. आम्ही यामध्ये काहीच बदल करू शकत नाही, असा दावा व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे. हा पतंजलीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी नमूद केले.