Breaking News

शेतकरी संप : सातार्‍यात मुंबईला दूध घेऊन जाणारे दोन ट्रक फोडले

सातारा, दि. 01 - शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडली आहे. सातार्‍यात शेतकरी संघटनेने कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून ट्रकची तोडफोड केली आहे. वारणा दूध डेअरीच्या या ट्रक आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावर ही घटना घडली. राज्यभरात 1 जूनपासून शेतकर्‍यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकर्‍यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकर्‍यांनी संपावर जाणार असल्याचं सांगितलं.
पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकर्‍यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता एक जूनपासून शेतकर्‍यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.