Breaking News

शेतकरी संपावर, दूध रस्त्यावर ओतलं, भाजीपाल्याच्या गाड्या रोखल्या

मुंबई, दि. 01 - राज्यातील शेतकरी आजपासून संपावर गेला आहे. शेतकर्‍यांच्या संपामुळे दूध, भाजीपाला, फळं यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडली. पुणे-बंगळुरु महामार्गावर शेतकर्‍यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. सातार्‍यात शेतकरी संघटनेने कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून ट्रकची तोडफोड केली. वारणा दूध डेअरीचे हे दोन ट्रक होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ट्रकचालकाला मारहाण केल्याचंही कळतं. शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर दूध आणि भाजीपाल्याचे गाडी अडवणार्‍या आठ शेतकर्‍यांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यावर
गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे. आंदोलक शेतकरी रस्त्यावर दूध, भाजीपाला फेकत होते. त्यानंतर रात्री तीनच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली आहे. तर राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी शेतकर्‍यांना बेदम मारहाण करत त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. शेतकरी संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ठप्प झाली आहे. किरकोळ अपवाद वगळता शेतकर्‍यांनी समितीकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. एरव्ही गजबजलेल्या समितीत आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे शेतकर्‍यांनी संप पुकारल्यामुळे शहरातली जनता गॅसवर आहे. शेतकरी संपावर गेल्याने भाजीपाला, दूध कसं मिळणार या प्रश्‍नामुळे अशा अनेक प्रश्‍नांमुळे शहरातल्या जनतेची तारांबळ उडाली आहे. तर दुसरीकडे शेतकर्‍यांनी घोषित केलेल्या संपाचा काही संधीसाधू व्यापार्‍यांनी गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे. अचानक भाज्यांचे भाव वाढवून व्यापार्‍यांनी सामान्यांची लूट सुरु केली आहे. शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकर्‍यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला.
त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता 1 जूनपासून शेतकर्‍यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.