Breaking News

जिल्हाधिकारी कवडे यांची कारकिर्द संस्मरणीयः महापौर कदम

अहमदनगर, दि. 28 - नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची नगरमधील कारकिर्द ही खरोखरच संस्मरणीय अशीच राहिली आहे. जिल्ह्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी स्वत:ला कामात झोकून दिल्याने अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली. एक अधिकारी म्हणून नव्हे तर हे शहर आपले आहे, जिल्हा आपला आहे या हेतूने काम केले आणि त्यांच्या या कार्याची दखल शासनाने घेऊन त्यांना आदर्श जिल्हाधिकारी म्हणून नुकतेच गौरविले आहे. त्यांचे मनपासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्याने मनपालाही अनेक चांगली कामे करता आली, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.
महानगरपालिकेच्यावतीने नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची पदोन्नत्तीवर बदली झाल्याने मनपाच्यावतीने महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका उषाताई नलावडे,उषाताई ठाणगे, छायाताई रजपुत आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर सौ.कदम म्हणाल्या, मनपामध्ये जेव्हा जेव्हा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी त्यावर तोडगा काढून त्या सोडविल्या. शहराच्या विविध प्रश्‍नांबाबतही त्यांच्याशी चर्चा करुन ते मार्गी लावण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.