Breaking News

बाबरी मशीद : अडवाणी, जोशी, भारतींवर कट रचल्याचा खटला!

नवी दिल्ली, दि. 19 - बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह 13 जणांवर गुन्हेगारी खटला चालणार आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती पीसी घोष आणि न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या याचिकेवर हा निकाल दिला आहे.
यावेळी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 13 जणांवर वादग्रस्त वास्तू पाडण्यासाठी कट रचल्याचा खटला चालणार आहे.  सर्वोच्च न्यायालयाने हा खटल्याची सुनावणी दोन वर्षात पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. शिवाय या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार असून या दरम्यान न्यायाधीशांची बदली होणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलंं. मशीद पाडल्यानंतर लखनौ आणि फैजाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आता या खटल्याची सुनावणी लखनौ कोर्टात होणार आहे.