Breaking News

मोदी भेटीनंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा भारताला दणका

मेलबर्न, दि. 19 - नुकत्याच भारत दौर्‍यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅलकॉम टर्नबुल यांनी मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांची मुक्तकंठाने स्तूती केली होती. या दोघांच्या मेट्रो प्रवासवरुन मोठी चर्चाही झाली होती. पण भारत भेटीवरुन मायदेशी परतताच टर्नबुल यांनी भारतीयांना चांगलाच दणका दिला आहे. मंगळवारी त्यांनी आपला ‘457 व्हिसा’ रद्द केला आहे. त्यामुळे याचा वापर करणार्‍या ऑस्ट्रेलियातील 95 हजार परदेशी कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार आहे.
एबीसीच्या अहवालानुसार, 30 सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये 95 हजार 757 परदेशी नागरिक होते. हे सर्व 457 व्हिसाचा वापर करत असून, यातील बहुतांश हे भारतीय नागरिक आहेत.  या व्हिसाद्वारे ऑस्ट्रेलियातील कंपन्यांमध्ये कौशल्य असलेल्या व्यक्तींना चार वर्षे काम करण्याची मुदत मिळते. पण आता हा व्हिसा रद्द केल्याने ऑस्ट्रेलियात काम करणार्‍या 95 हजार परदेशी नागरिकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.