Breaking News

बुध्द विहार व समाज मंदिरे बौध्द धम्माची प्रचार केंद्रे व्हावीत : भीमराव आंबेडकर

कराड, दि. 27 (प्रतिनिधी) : बौध्द समाजाचे सामाजिक व आर्थिक परिवर्तन फक्त आरक्षणातून झाले नाही तर बौध्द धम्माच्या आचार विचारातून व डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल केल्याने हे परिवर्तन झाले आहे. बाबासाहेबांचा विचार सर्वदूर पोहोचविण्याकरीता गावागातील बुध्द विहारे व  समाज मंदिरे ही धम्माची केंद्रे झाली पाहिजेत, असे प्रतिपादन भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले. 
भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा यांच्यावतीने बौध्द धम्म परिषद व दीक्षा समारंभानिमित कार्वे नाका येथील महाविहारात आयोजित धम्म परिषदेत ते बोलत  होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष व्ही. आर. थोरवडे होते. यावेळी चैत्यभूमी मुंबई येथील पुज्य भन्ते सुमेध बोधी, राष्ट्रीय सचिव  एन. एम. आगाणे, प्रभाकर जाधव, एस. एस. माने, पुणे जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस. पी. दीक्षित, सांगली जिल्हाध्यक्ष जितेंद्र  कोलप, सेवानिवृत्त जनरल मॅनेजर पारेषण सुदाम ढापरे, निवृत्त कार्यकारी अभियंता दिलीपराव थोरवडे, निवृत्त असिस्टंट कमिशनर सेंट्रल एक्साईज व्ही. एस.  गायकवाड, अरूण गायकवाड, प्राचार्य सुरेश खरात, जिल्हा कोषाध्यक्ष यशवंत काकडे, कराड तालुका कोषाध्यक्ष अशोक सोनवले, रमेश सोनवले उपस्थित होते.
भीमराव आंबेडकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कराड येथे सातत्याने भारतीय बौध्द महासभेतर्फे बौध्द धम्म परिषद घेतली जात आहे. या परिषदेच्या माध्यमातून  प्रत्येकवर्षी अनेक श्रामणेर बौध्दचार्य शिबीर, उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर व समता सैनिक दल शिबीर आयोजित करून धम्मसेवक तयार करण्याचे काम वेगाने  व सातत्याने चालू आहे. धम्म कार्याचा आदर्श महाराष्ट्रातील इतर जिल्हे घेतील, असा विश्‍वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.