Breaking News

अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

नांदेड, दि. 10 - गेल्या पाच वर्षांपासून होत असलेल्या नापिकीमुळे व यंदा पडलेल्या ओल्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना रविवारी घडल्या.
गोजेगाव ता. मुखेड येथील मारोती गणपत पांचाळ 55 हे दुष्काळ, कर्ज, नापिकीमुळे त्रस्त होते. त्यात या वर्षी ओल्या दुष्काळामुळे त्यांच्या शेतातील उडीद,  सोयाबीन, ज्वारी यांसह पाच एकर शेतावरील सर्व पिके वाहून गेली. या चिंतेतून त्यांनी आत्महत्या केली. दुसर्‍या घटनेत हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील  शेतकरी शिवाजी तुकाराम जाधव 40 यांनी आत्महत्या केली. तीन वर्षांपासून नापिकी आणि बँकेचे कर्ज अशी चिंता त्यांना होती. या वर्षी अतिवृष्टी झाल्याने  हातातोंडाशी आलेले पीक गेले होते. यातून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.