Breaking News

धर्मभेद मंगळ अन् वैरही पुरातन

इडापिडा जावो आणि 
बळींचे राज्य येवो

ही म्हण फार प्राचिन काळापासून चालत आली आहे. हिंदू लोकांचा व ब्राम्हण लोकांचा अति संक्षिप्त पण प्राचीन इतिहास भरलेला आहे. फार प्राचीन काळी बळी या  नावाचा सत्यप्रिय न्यायी राजा होऊन गेला. आमच्या या परम न्यायी व दयाळू राजाचे आणि परदेशातून आलेल्या ब्राम्हणांचे वैमनस्य होते. बळी राजाचा उत्कर्ष  ब्राम्हणाला सहन न होऊन त्याने त्याला कपटाने मारले आणि याच कारणामुळे ब्राम्हणांत बलीचा पुतळा करून त्याचे पोट भोसकण्याची रूढी पडली आहे. परंतु  आम्ही त्या बळीचे वंशज असल्यामुळे आमच्या स्त्रिया आम्हाला ओवाळतात इडापिडा जावो आणि बळीचे राज्य येवो असे अत्यंत प्रेमाने म्हणत असतात. ब्राम्हणांत  आणि बहुजनांत इतका भेद आहे तर ते व आम्ही एकाच धर्माचे कसे? हजारो वर्षांपासून ब्राम्हणांचे आम्हांशी संघटन असल्यामुळे आमच्यांतील काही थोप मूळपुरूष  त्यांच्या देव्हार्‍यात बसलेले आजही दिसत नाही. आता ब्राम्हणांतील काही धर्मकर्म आमच्यांत व आमच्यांतील काही ब्राम्हणांत शिरली असतील तरी त्यांच्या  आमच्या वेगळेपणाच्या पुष्कळ रूढी अद्यापि दिसत आहेत. ब्राम्हणांनी आमच्या मनुष्यपणाचे मातेरे केले तरी आम्ही टिकून राहिलो याचे श्रेय जैन, बौध्द या धर्मास  व एक नाममहिमा ठाम करणार्‍या नामदेव, कबीर, एकनाथ, तुकाराम इत्यादि धर्मोपदेशकांस दिले पाहिजे. आणि सध्या आम्हांस आमचेपण कळू लागण्याचे श्रेय  ख्रिस्तीसमाज, ब्राह्मण समाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज, सत्यशोधक समाज यांस दिले पाहिजे.
ब्राम्हण लोक प्रेत जाळतातच, कधीही पुरीत नाही. मग तो ब्राम्हण कोणत्याही योग्यतेचा असो, परंतु आमच्यांत हा नियम नाही. आमच्यांतील बहुतेक लोक प्रेते  पुरीत असतात. अलीकडे काहीजण प्रेते जाळू लागले आहेत. ब्राम्हणांच्या प्रेतास आमच्यातील जिवंत मनुष्याचा स्पर्श झाला असता हे विटाळले असे ब्राम्हण  समजतात. ब्राम्हण मनुष्य श्रीमान व धट्टाकट्टा सला तरी शेजारच्या दरीद्री व रोगी हिंदू मनुष्यापुढे एका पैशाकरीता हात पसरील, पण तो श्रीमंत भिक्षुक मनांत  लाजणार नाही, असे निर्दय व निर्लज्जपणाचे वर्तन दोन घास खाऊन दिवस काढणारा हिंदू कधीही करणार नाही. त्याचे अंतःकरण भटभिक्षुकासारखे कठीण नसते.
ब्राम्हण दोन्ही हातांनी नमस्कार करतात, पण इतर हिंदूस करीत नाही. परस्परांस प्रमाण करण्यातही फरक. ब्राम्हण आणि क्षत्रिय यांचे भयंकर वैर-ब्राम्हण  पक्षांतील परशुराम नावाच्या ब्राम्हण पुढार्‍याने हिंदूंच्या क्षत्रिय पुढार्‍यांचा निःपात करण्यासाठी एकवीस वेळा प्रयत्न केला. आणि असंख्य क्षत्रिय मारले. क्षत्रियाचे  एक दिवसांचेही बालक त्याने सोडले नाही व एक क्षत्रियही ठेवला नाही. शेवटी क्षत्रियांच्या विधवा स्त्रियांशी परशुरामाच्या ब्राम्हण सैनिकांनी नियोग करून नवे  क्षत्रिय उत्पन्न केले ही ब्राम्हणांच्या पुराणांतील कथा सर्वश्रुत आहे. त्याबद्दल विशेष सांगावयास नको. ही कथा खरी तर नाहीच नाही. पण या गोष्टीवरून एवढे मात्र  उघड होते की ब्राम्हण आणि इतर हिंदू लोक यांचे फार प्राचीन काळापासून वैर आहे. परशुरामाने कदाचित काही क्षत्रिय मारले असतील. परंतु सर्व पृथ्वी निःक्षत्रिय  करून क्षत्रियांच्या स्त्रियांशी ब्राम्हणांनी नियोग करून नवे क्षत्रिय अस्तित्वात आणले हे म्हणणे निव्वळ मत्सराचे आहे, अगदी सत्य आहे. ज्यांना जन्मांत शस्त्र  धरण्याचा अभ्यास नाही त्या नेभळ्या ब्राम्हणांनी क्षत्रियांसारख्या कसलेल्या योध्दांचा पराभव व तोही एकवीस वेळा करणे म्हणजे गाई - बकर्‍यांनी एकवीस वेळा  निव्याघ्र करणे होय. आता कोणी असे म्हणेल की परशुराम हा ईश्‍वराचा अवतार होता. त्यामुळे कोणाचेही सहाय्य न घेता क्षत्रिय मारणे त्याला कटीण नव्हते. परंतु  यावर इतकेच म्हणता येईल की राम हाही ईश्‍वराचा अवतार मानतात. मग त्याने रावणास जिंकण्यासाठी वानरांची जंगी सेना कशाला नेली होती. बरे परशुराम  ईश्‍वराचा अवतार होता तर क्षत्रियांस मारण्याचे त्याचे प्रयत्न का फसले? अशा गोष्टी ब्राम्हणांनी रचल्यामुळे जातीजातीत तंटे मात्र लागले आहेत. हा अमंगळ  भेदाभेद मंगळ ठरवून ब्राम्हणांनी निर्माण केलेली जातीय तटबंदी आमच्यातील तंटेबखेडा वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.