Breaking News

खडसेंच्या सद्यस्थितीला रामटेक जबाबदार?

मुंबई, दि. 06 - एकेकाळी सत्ताकेंद्र अशी ओळख असलेला आणि मंत्रीगणासाठी स्टेटस सिंबॉल बनलेला रामटेक बंगला आता अपशकुनी ठरला असल्याचे दिसून येत आहे. कॅबिनेट मंत्री हा बंगला मिळावा म्हणून जंगजंग पछाडत असत मात्र आता नव्याने कुणीही मंत्र्याने या बंगल्याची मागणी केलेली नाही. भ्रष्टाचार आरोपावरून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावे लागलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे या बंगल्यात राहात होते.
रामटेक बंगल्यात राहावयास आल्यानंतर चार बड्या नेत्यांना चांगलाच झटका बसल्याचे सांगितले जात आहे. त्यात विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ व आता एकनाथ खडसे यांचा समावेश आहे. 2014 मध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर रामटेक आपल्यालाच मिळावा यासाठी मंत्र्यांमध्ये चुरस सुरू होती. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे याही याच बंगल्यासाठी उत्सुक होत्या पण अखेर तो खडसे यांना मिळाला. आठ हजार चौरस मीटरपेक्षाही अधिक परिसरात असलेला हा बंगला प्रशस्त, शांत तसेच समुद्राचे सुंदर दर्शन घडविणारा आहे. मात्र पाठोपाठ चार मंत्र्यांच्या बाबतीत या बंगल्यात राहिल्यानंतर त्यांना राजकीय संकटास सामोरे जाण्याची पाळी आल्याचे आता लक्षात येत आहे.
काँग्रेसचे विलासराव देशमुख या बंगल्यात राहावयास आल्यानंतर त्यांना अनेक राजकीय संकटांना सामोरे जावे लागले. विधानसभा हरण्याची पाळीही त्यांच्यावर आली व त्यांचे राजकीय करियर रसातळाला गेले. त्यातून वर येण्यासाठी त्यांना चार वर्षे संघर्ष करावा लागला होता. 1996 साली गोपीनाथ मुंडे युती सरकारात असताना येथे राहावयास आले व अ्नेक वाद विवादांना तोंड फुटले. त्यात मुंडे यांची खुर्ची जाण्याची पाळी आली होती. 2003 साली छगन भुजबळ येथे राहावयास आले. त्याचवेळी तेलगी स्कॅम उघडकीस आले व आता तर भुजबळ तुरूंगातच आहेत.
खडसे गेल्या वर्षी येथे राहावयास आले व त्यांचे दाऊद फोन प्रकरण तसेच पुणे जमीन खरेदी घोटाळे उघडकीस आल्यानंतर त्यांना खुर्ची सोडावी लागली. दोन महिन्यांपूर्वीच खडसे यांनी येथे वास्तूशांत केली होती. अजूनही खडसे यांनी हा बंगला खाली केलेला नाही. मात्र फडणवीस सरकारमधील कोणत्याच मंत्र्याने हा बंगला मिळावा अशी उत्सुकता दाखविलेली नाही.