Breaking News

केंद्र सरकारच्या गोदामात 8 लाख टन तूरडाळ पडून

मुंबई, दि. 18 -  केंद्र सरकारच्या गोदामात तूरडाळीचा राखीव साठा 8 लाख टन (बफर स्टॉक) पडून असून, 120 रुपये किलो दराने ही डाळ ग्राहकांना  विकण्याचे बंधन केंद्र सरकारने घातलेले आहे. मात्र महाराष्ट्र शासनाच्या नागरी पुरवठा खात्याने यापैकी फक्त दोन हजार टन तुरडाळीची मागणी केंद्राकडे केली  असून, त्यापैकी फक्त 700 टन तूरडाळ महाराष्ट्राकरिता पाठवण्यात आली आहे. मात्र या डाळीचे 120 रुपये दराने अद्याप वितरण झालेले नाही.
नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी ही गोष्ट मान्य केली की, राज्य सरकारने दोन हजार टन डाळ केंद्र सरकारकडे मागितली होती. प्रत्यक्षात 700 टन डाळ  मिळालेली आहे. मात्र याचे वाटप कधी होणार याचे उत्तर अनुत्तरीत आहे. त्यामुळे खासगी व्यापा-यांनी आता डाळीचा दर पुन्हा 200 रुपये किलो असा केला  असून, उडीद डाळींचा दरही 30 रुपयांहून आता 170 रुपयांवर गेला आहे.
महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतलेल्या 700 टन तुरडाळीचे वाटप रेशन दुकानांवर करा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे.
मात्र केंद्राच्या पडून असलेल्या डाळीप्रमाणे राज्य शासनाचीही 710 टन डाळ पडूनच आहे.