टँकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू
अहमदनगर । प्रतिनिधी । 02 - झाडाखाली उभ्या असलेल्या टँकरच्या खाली सावलीत विश्रांती घेणार्या आजीबाईंचा रविवारी दुपारी दोनच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. टँकरखाली कोण आहे, हे न पाहता टँकर मागे घेताना (रिव्हर्स) टँकरचे चाक अंगावरून गेल्याने आजीबाईंचा जागेवरच अंत झाला. आसराबाई मुरलीधर शिंदे (वय 75, रा. सारसनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
सावेडी परिसरात श्रीकृष्णनगर भागातील दळवी मळ्यात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. दळवी मळ्यात एक खासगी विहीर आहे. या विहिरीतून पाणी भरण्यासाठी दळवी मळ्यातील शेतात टँकर आले होते. मात्र ते नादुरुस्त झाल्याने टँकर एका झाडाखाली उभे करून चालक निघून गेला. याचवेळी उन्हाच्या कडाक्याने थकलेल्या आजीबाई टँकरच्या खाली असलेल्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी झोपल्या. पाणी भरण्यासाठी विहिरीजवळ टँकर घेण्यासाठी चालकाने टँकरला मागे घेताना टँकरचे क्लिनरच्या बाजूचे चाक आजीबाईंच्या अंगावरून गेले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना एका रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आजीबाईंचा मृत्यू झाल्याचे कळताच टँकर जागेवरच सोडून
चालक फरार झाला.तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. या प्रकरणी शेतमालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकरचालक आवारे (पूर्ण नाव नाही) याच्याविरुद्ध (टँकर क्रमांक एम. एच. 16,क्यू-5651) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेने सावेडी प
रिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.