भूमाताच्या तृप्ती देसाईंना धमकीचे निनावी पत्र
अहमदनगर । प्रतिनिधी । 14 - शनि-शिंगणापुरातील चौथर्यावर महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन करणार्या ‘भूमाता ब्रिगेड’च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना अज्ञात व्यक्तीने धमकीचे पत्र पाठविले असून चौथर्यावर जाण्याचा हट्ट करू नका. अन्यथा, तुमचाही नरेंद्र दाभोळकर व्हायला वेळ लागणार नाही, अशा आशयाचे पत्र देसाई यांना प्राप्त झाले आहे.
धनकवडी येथील घरच्या पत्त्यावर हे पत्र देसाई यांना आले आहे. यात सामान्य नागरिकांना तुमच्या आंदोलनामुळे त्रास होत आहे. याची तुम्हाला कल्पना आहे का? तुम्ही खरोखरच सरकारविरुद्ध लढत असाल, तर खुशाल लढा. पण, स्त्री समानतेसाठी शिंगणापूरच का? तुम्हाला शेतकरी वर्ग दिसत नाही. बसच्या पाससाठी पैसे नसतात म्हणून मुलगी आत्महत्या करते, त्यावेळी कुठे गेलेली असते तुमची भूमाता ब्रिगेड? स्वत:ला रणरागिणी समजता, तर स्त्राीशिक्षणासाठी लढा. स्त्री सुरक्षित होण्याचा विचार करा. मात्र, असा हट्ट करू नका. नाहीतर तुमचा पण नरेंद्र दाभोलकर व्हायला वेळ लागणार नाही, असे निनावी पत्र देसाई यांना आले आहे.