संयुक्त महाराष्ट्रासाठी दुसर्या लढ्याची तयारी
मुंबई, प्रतिनिधी, दि. 18 - संयुक्त महाराष्ट्र या लढ्यातील प्राणाची आहुती देणार्या हुतात्म्यांना हुतात्मा चौकात वंदन करून या नव्या लढ्याची सुरुवात केली आहे. एकीकडे वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरत असतानाच साठ वर्षांपूर्वीचा हा प्रश्न नव्याने हाती घेत तो तडीस नेण्याचे मोठे आव्हान आयोजकांसमोर असेल. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर असो की भालकी या मराठी बहुल सीमावर्ती पट्ट्यातील जनता आजही महाराष्ट्रात येण्यास आतुर आहे. कानडी सरकारचे अत्याचार सोसत आजही ही जनता महाराष्ट्राच्या पाठिंब्याकडे डोळे लावून बसली आहे. त्यांच्या अपेक्षांना प्रतिसाद देत या लढ्याला महाराष्ट्रातील जनतेने अधिक बळ दिले पाहिजे, या भूमिकेतून मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने संयुक्त महाराष्ट्राच्या दुसर्या लढ्याचे रणशिंग फुंकण्यात आले.
मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने वर्षभरापूर्वी सीमावर्ती भागातील मराठीबहुल चार शहरे आणि 865 गावांचा अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. या दौर्यात मराठी भाषकांशी प्रत्यक्ष संवाद साधून भावना जाणून घेण्यात आल्या. आजही हा मराठी भाषक समाज महाराष्ट्रात येण्याचे स्वप्न पाहतो आहे. म्हणूनच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या या दुसर्या लढ्याद्वारे राजकीय, सामाजिक आणि इतर व्यासपीठावरून ही भावना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस डॉ. पवार यांनी व्यक्त केला. आपल्या सीमावर्तीय बांधवांची ही भावना समजून घेऊन सर्वोच्च न्यायालयातही आपली बाजू अधिक जोरकसपणे मांडावी, असे आवाहन या निमित्ताने सरकारला करणार असल्याचेही ते म्हणाले.
हुतात्मा दिनाचे औचित्य...
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना रविवार, दि. 17 जानेवारी रोजी मुंबईतील हुतात्मा चौकात अभिवादन करून या लढ्याची सुरुवात केली आहे. 17 जानेवारी हा दिन सीमावर्ती भागात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो, तसा तो संपूर्ण महाराष्ट्रातही पाळला जावा, ही या मागची भूमिका आहे.