Breaking News

दखल भाजपचं आणखी एक घूमजाव

वादग्रस्त विधानं करायची आणि ती अंगलट आली, की माघार घ्यायची किंवा मी तसं बोललोच नाही, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नाही, असं सांगायचं, अशी भाजपच्या नेत्यांची वागण्याची रीत झाली आहे. समाजात कायम संभ्रम राहील, विकास, बेरोजगारी ,अच्छे दिनाच्या मुद्द्यावरून सरकारची कोणी कोंडी करणार नाही, अशी व्यवस्था भाजपचे शीर्षस्थ नेते करीत आहेत. लोकसभेची गेली निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुद्यावर लढविली. तेव्हा राम मंदिर, 370 वे कलम, समान नागरी कायदा असे मुद्दे बाजूला ठेवण्यात आले होते. साडेचार वर्षे सत्ता भोगल्यानंतर आता मात्र मोदी यांना विकासाचा मुद्दा नकोसा झाला आहे.
................................................................................................................................................
मुस्लीम समाज, त्या समाजाचे स्त्रियांचे प्रश्‍न, समान नागरी कायदा, काश्मीरचे 370 वे कलम, राम मंदिर हे विषय् महत्त्वाचे वाटायला लागले आहेत. विश्‍व हिंदू परिषद, डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी आदींनी लोकसभा निवडणुकीआधीच राम मंदिराची बांधणी सुरू होईल, असे वक्तव्य केलं आहे. गिरीराज सिंह, उमा भारती आदींनी तर न्यायालयाचा प्रश्‍न येतोच कुठे,इथं श्रद्धेचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे, असं सांगायला सुरुवात केली आहे. शिवसेनेेनं तर भाजपची कोंंडी करण्यासाठी राम मंदिराची उभारणी, समान नागरी कायदा, 370 वे कलम आदी मुद्द्यांचा भाजपला विसर पडला असल्याचं म्हटलं आहे. संघ व भाजप परिवारातील वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या नावानं आणि वेगवेगळ्या तोंडानं राम मंदिराचा मुद्दा उकरून काढीत असताना त्यांना राम मंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, याचं भान नाही. एखादं प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्यावर भाष्य करणं हे न्यायालयाचा अवमान आहे, तसंच न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप असतो, एवढं तरी सत्ताधारी भाजपला कळायला हवं. अगोदरच न्यायपालिकेतील सत्ताधार्‍यांच्या हस्तक्षेपाबाबत उलटसुलट चर्चा होत असताना आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या विधानावरून वाद झाला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या आधीच अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरू होईल असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे. राम मंदिर-बाबरी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशात शाह यांनी हे वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस आणि इतर विरोधक भाजपवर निशाणाही साधण्याची शक्यता आहे. भाजपातील नेत्यांसोबत शाह यांची एक बैठक हैदराबादमध्ये झाली. त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. निवडणुका जाहीर होण्याआधीच राम मंदिर निर्मितीच्या दृष्टीनं योग्य ती पावलं उचलली जातील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पी शेखरन यांनी पत्रकारांना बैठकीत काय घडलं हे सांगताना शाह यांनी केलेलं हे वक्तव्य सांगितलं. एवढंच नाही तर वेळेआधी निवडणुका घेण्याचा काहीही विचार सध्या नाही असंही शाह यांनी सांगितल्याचं शेखरन यांनी म्हटलं आहे. शेखरन हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यामुळं ते बैठकीत होते. बैठकीत शाह यांनी काय वक्तव्य केलं, हे सांगताना त्याच्या परिणामांची त्यांना जाणीव असली पाहिजे. ते कोणी सोम्या, गोम्या नाहीत. भाजपनं राम मंदिराची निर्मिती केली नाही, तर हा पक्ष रसातळाला जाईल असं वक्तव्य माजी खासदार आणि रामजन्मभूमी न्यासाचे वरिष्ठ सदस्य डॉ. राम विलास वेदांती यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका होण्याआधी राम मंदिराची निर्मिती आम्ही लवकरच करणार आहोत, हे सांगतच भाजपनं मतांचा जोगवा मागितला आणि उत्तर प्रदेशात त्यांना रामाचं नाव घेतल्यानंच जिंकता आलं. आता जर या पक्षानं राम मंदिराची निर्मिती केली नाही, तर हा पक्ष रसातळाला जाईल असं वेदांती यांनी म्हटलं होत; मात्र शाह यांनी या संदर्भातल्या चर्चांना पूर्णविराम देत निवडणुकांच्या आधीच राम मंदिराची निर्मिती होईल असं वक्तव्य केलं आहे.
मंदिर वहीं बनाएंगे’ हा भाजपचा नारा देशात सर्वश्रुत आहेच. विरोधकांनी या मुद्द्यावरूनही भाजपवर निशणा साधलेला आहे. मंदिर वहीं बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे’ हे भाजपचं धोरण आहे आणि ते फक्त मतांसाठी मंदिर निर्मितीच्या गोष्टी करतात, अशी टीका काँग्रेससह इतर विरोधकांनी बर्‍याचदा केली आहे. आता शाह यांच्या या वक्तव्याबाबत काँग्रेस किंवा इतर पक्ष काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे; परंतु विरोधकांच्या प्रतिक्रिया येण्याआधीच त्यावरून वादंग सुरू झाल्यानं शाह यांनी असं वक्तव्य केलं नव्हतं, अशी सारवासारव सुरू केली आहे.
हैदराबादच्या बैठकीत शाह यांनी असं काही वक्तव्य केलं नव्हतं, असं भाजपनं स्पष्टीकरण केलं आहे. 2019 च्या निवडणुकांच्या आधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरू होईल असं वक्तव्य शाह यांनी हैदराबादमध्ये केल्याचं वृत्त आलं होतं; मात्र आता भाजपनं या भूमिकेवरून यू टर्न घेतला आहे. खरं तर राम मंदिर आणि बाबरी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शाह यांनी हे वक्तव्य कसं केलं, याची चर्चा सुरू झाली. त्यातच आता भाजपनं यू टर्न घेत असं काहीही वक्तव्य शाह यांनी केलं नसल्याचं म्हटलं आहे. राम मंदिर-बाबरी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशात शाह यांनी यांच्या वक्तव्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.