Breaking News

संप एक जूनचा, आंदोलनात शेतकर्‍यांनी सक्रिय सहभागी व्हावे

राज्यातील शेतकर्‍यांच्या तोंडाला केवळ आश्‍वासनांची पाने पुसण्याचा कृतघ्नपणा सरकारने केला आहे. सरकारने जगाचा अन्नदाता असलेल्या शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचे पातक केले आहे. राज्यातील शेतकर्‍यांनी आजपासून पुन्हा संप व आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.आपला हक्क मिळविण्यासाठी व मागण्या मंजूर करुन घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पक्षाभिनिवेष न बाळगता या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून आम्ही सदैव शेतकरीहिताचीच भूमिका घेतलेली आहे. शेतकरीहिताच्या लढ्यात आम्ही शेतकरी म्हणून नेहमीच आघाडीवर होतो, यापुढेही राहू. शेतकर्‍यांच्या संप व आंदोलनाला आमचा सक्रिय पाठींबा आहे. राज्य व केंद्रातील सरकारे शेतकरी व सहकारविरोधी आहेत. या सरकार व सत्ताधार्‍यांना शेतकरी व सामान्यांच्या समस्या सोडवायच्याच नाहीत. उलट शेतकरी व सहकार अडचणीत कसा येईल यावर सरकारचा कल व भर असल्याची टीका करुन ते म्हणाले की, निवडणूकीपूर्वी शेतकर्‍यांवर आश्‍वासनांचा पाऊस पाडणार्‍या भाजपाला सत्तेवर आल्यानंतर स्वतःच्याच जाहीरनामा व आश्‍वासनांचा विसर पडावा हे दुर्दैंवी आहे. अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करुन देशाला अन्नधान्य व भाजीपाला, दूध या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारा अन्नदाता शेतकरी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे देशोधडीला लागला आहे.सरकार दरबारी शेतकरी व त्याच्या मागणीची दखल घेतली जात नाही, हे केवळ संतापजनक आहे. मागील पंधरा वर्षात देशभरातील जवळपास साडेतीन लाख शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला वैतागून जीवन संपविले आहे. मागील चार वर्षात शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र सरकारला याचे सोयरसुतक नाही अशी टीका करुन ते म्हणाले की, शेतमालाला संबंधित पिकाच्या उत्पादनखर्चावर आधारित दीडपट हमीदर देण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच विरले आहे. कर्जापासून मुक्ति आणि शेतकर्‍यांच्या शेतीमालाला रास्त व वाजवी किमान भाव हा मिळालाच पाहिजे. एकीकडे शेतीमालाचे दर कोसळत असताना सरकार देशात पुरेसा उपलब्ध असलेला शेतमाल व साखरेची आयात करीत असून, हा सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा ठोस पुरावाच आहे.दूधाच्या दरवाढीची सरकारची घोषणा केवळ बनवाबनवी असल्याची टीका नागवडे यांनी केली आहे.