Breaking News

अतिरिक्त उत्पन्नासाठी गट शेतीला प्राधान्य द्या : आढाव


कोपरगाव ता. प्रतिनिधी

कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गट शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले. 

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे उन्नत शेती - समृद्ध शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढाव बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी वसंतराव भाकरे होते. आढाव म्हणाले, शेतकऱ्यांनी शेततळे करुन त्यावर ठिबक सिंचन बसवावे. जमिनीत पाणी जिरविण्यासाठी बांधबंधिस्ती करावी, शेतातून पाणी बाहेर जाऊ देऊ नये, तसेच बोंडअळी नियंत्रणासाठी एकाचवेळी कपाशीची लागवड करावी त्यामुळे फवारणी एकाच वेळी येते. पळाटी काढून ती नस्ट केल्याने रोगावर नियंत्रण मिळविता येते.

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत. फळबाग अनुदान, ठिबक सिंचनसाठी अनुदान, शेतीचे अवजारे, कांदाचाळ, ट्रॅक्टरसाठी, प्लास्टिक कागद अनुदान दिले जाते. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आढाव यांनी केले. 

यावेळी सरपंच संगीता आहेर, उपसरपंच अप्पासाहेब काजळे, कृषी पर्यवेक्षक एम. आर. मंडलिक, मंडलाधिकारी ए. के. आरणे, कृषी सहाय्यक ए. पी. सावंत, लक्ष्मण चौधरी, रंगनाथ काजळे, जनार्दन जगताप, संदीप काजळे, प्रभाकर भाकरे, प्रकाश करडे, अशोक काजळे, संदीप भाकरे, सोपान काळे, दीपक चोधरी, किशोर तायडे आदींसह पंचक्रोशीतील उपस्थित होते.