Breaking News

तिरंगी मालिकेत भारताची इंग्लंडवर मात


नवी दिल्ली प्रतिनिधी

तिरंगी मालिकेमध्ये भारत अ संघाने इंग्लंड लायन्स संघावर १०२ धावांनी मात करत या मालिकेतला दुसरा विजय मिळवला आहे.मयांक अग्रवालच्या खेळीच्या जोरावर भारत अ संघाने ५० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात ३०९ धावसंख्या गाठली. इंग्लंड लायन्सचा संघ ४१.३ षटकात २०७ धावांवर माघारी परतला. मुंबईकर शार्दुल ठाकूरने ५३ धावांत ३ गडी बाद केले.

मयांक अग्रवालच्या ११२, शुभमन गिलच्या ७२ आणि हनुमा विहारीच्या ६९ धावांनी भारतीय संघाला उभारणी दिली. पृथ्वी शॉ च्या जागी शुभमन गिलला सलामीला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. या संधीचा पुरेपूर फायदा घेत गिलने अर्धशतकी खेळी केली. मयांक अग्रवालचं या स्पर्धेतलं हे तिसरं शतक ठरलं. आपल्या शतकी खेळीत मयांक अग्रवालने १० चौकार आणि ४ षटकार लगावले.

यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव कोलमडला. इंग्लंड लायन्स संघाचा एकही फलंदाज मोठी भागीदारी रचण्यामध्ये अयशस्वी ठरला, एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवणं सोपं झालं. शार्दुल ठाकूरने सामन्यात ३ बळी घेतले, त्याला खलिल अहमदने २ बळी घेत चांगली साथ दिली.