डॉ. विखेंच्या पाठपुराव्यामुळे आले विजेचे खांब गारपिटग्रस्त भागाची केली पाहाणी
आश्वी : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर, मनोली, ओझर आणि पंचक्रोशीतील वाड्यावस्त्यांवर वादळी पावसाने खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे स्थानिक ग्रामस्थ हैराण होते. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी वीजवितरण कंपनीकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तातडीने ३० खांबांची उपलब्धता करुन देण्यात आली.
मागील आठवड्यात {शुक्रवारी} रहिमपूर, मनोली, ओझर आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये वादळी वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात गारपीठ झाली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांचे पत्रे उडून गेले. जनावरांच्या गोठ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळबागा आणि हाताशी आलेल्या शेती पिकांनाही या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. यात प्रामुख्याने गावागावातील वीजेचे खांब जमिनदोस्त झाले. त्यामुळे मागील ३ दिवसांपासून या गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजच नसल्याने नागरी जनजीवन विस्कळीत झाले होते. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युवा नेते डॉ. विखे पाटील यांनी रहिमपूर, मनोली, ओझर या तीनही गावांमध्ये नुकसान झालेल्या बहुतांशी भागांना प्रत्यक्ष भेटी देत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.
याप्रसंगी डॉ. विखे पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास तांबे, जिल्हा परिषद सदस्या अॅड. रोहिणी निघुते, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, रामभाऊ भुसाळ, विविध गावांमधील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.