Breaking News

चौंडीतील कार्यक्रमात गोंधळ घालणार्‍या 130 जणांवर गुन्हे दाखल

51 जणांना अटक, धनगर आरक्षणाचा मुद्दा चिघळणार? दोन वेगवेगळे गुन्हे दाखल
कर्जत / प्रतिनिधी । 

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू असणार्‍या कार्यक्रमात, आरक्षणाबाबत घोषणा देणार्‍या, पत्रके भिरकावणार्‍या डॉ. इंद्रकुमार भिसे व सुर्यकांत कांबळे यांच्यासह 51 जणांना अटक तर जवळ-जवळ 130 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळण्याची शक्यता आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या 293 व्या जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी डॉ. इंद्रकुमार भिसे व सुर्यकांत कांबळे यांना जिल्हाबंदीची नोटीस असतानाही, जयंती कार्यक्रमात येवून आरक्षणाबाबत घोषणा देत असताना, पोलीस त्यांना ताब्यात घेत आसताना धक्काबुक्की करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कामाचे नुकसान करणे, असे भिसेसह 40 ते 50 कार्यकर्ते तसेच सुर्यकांत कांबळेसह 70 ते 80 कार्यकर्ते अशा सुमारे 110 ते 130 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 51 जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल गहिनीनाथ यादव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती समारंभ कार्यक्रमात इंद्रकुमार भिसे, सुर्यकांत कांबळे व रवी देशमुख हे गोंधळ घालणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. म्हणूनच वरील तिघांना जिल्हा बंदीची नोटीस बजावली होती. ते घरी नव्हते तेव्हा आम्ही घराच्या दर्शनी भागावर नोटीस चिकटवली होती, जयंतीदिवशी 31 मे रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास 70 ते 80 कार्यकर्ते कांबळे यांचेबरोबर सभामंडपात येवून घोषणाबाजी सुरू केली. हे नगर, बीड, धाराशीव, नांदेड, पुणे जिल्ह्यातील आहेत. सुरेश कांबळे सह 70 ते 80 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात पो.कॉ. इरफान शेख, पो.कॉ. नदीम शेख, पो.कॉ. श्रीकृष्ण केकाण, पो.कॉ. गणेश साने, पो.कॉ. दत्तू बेलेकर हे जखमी झाले, तसेच सरकारी जीपच्या काच फुटली आहे. यात 70 ते 80 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दुसरी फिर्याद पोलीस श्यामसुंदर जाधव यांनी दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी जयंती सभामंडपात इंद्रकुमार भिसे सह 40 ते 50 जण आले व गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आरक्षणाबाबत घोषणाबाजी केली. भिसे यांना ताब्यात घेत आसताना 30 ते 35 जणांनी भिसेंना घेऊन जाण्यास मज्जाव केला, सरकारी कामात अडथळा आणला. गुन्हे शाखेचे संदिप पवार यास डोक्यात मार लागून जखम झाली. या गुन्ह्यात इंद्रकुमार भिसे, किशोर मासाळ, नितीन मासाळसह पुणे, नगर येथील 17 जणांना अटक केली आहे. तसेच 15 ते 20 जण फरार आहेत. 
इंद्रकुमार भिसे हे गेल्या चार दिवसांपासून फेसबुकवर व सोशल मीडियावर चौंडीत दुसरी जयंती साजरी करणार, आरक्षणासाठी आंदोलन करणार, सरकारी गाड्या फोडणार असे मेसेज पाठवत होते. या प्रकरणी इंद्रकुमार भिसे व सुर्यकांत कांबळे यांना जिल्हा बंदीची नोटीस असतानाही ते जयंती समारंभ कार्यक्रमस्थळी आले कसे? हा प्रश्‍न गुलदस्त्यात आहे. भिसेबरोबर घोषणा देण्यासाठी बारामती येथील काही पदाधिकारी यांची मुले होती. पोलीसांवर राजकीय दबाव आल्याने परस्पर काही नावे कमी झाले कशी? असाही प्रश्‍न आहे. एक जिल्हा परिषद अध्यक्ष जयंती कार्यक्रमात मंचावर उपस्थित होते, त्यांचा मुलगा मागे आरक्षणाबाबत घोषणा देत होता, पोलीसांनी त्यालाही पकडले होते मात्र, त्याचे नाव आरोपी यादित नाही.
बहुजन एकता परिषदेने चौंडीजवळ चापडगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यासाठी रितसर कर्जत पोलीस स्टेशनची परवानगी घेतली होती. परंतु जयंती साठी दुपारी दोनची वेळ असताना, कर्जत पोलिसांनी सकाळपासून आम्हाला दमबाजी देण्यास सुरुवात केली होती. आमचे सांस्कृतिक कार्यक्रम बंद पाडले, आमचा हा अराजकीय सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होता, या कार्यक्रमासाठी माजी आ. विजय मोरे, लक्ष्मण माने, अरूण जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आम्ही रितसर परवानगी घेतली असताना, आम्हाला त्रास देणार्‍या पोलीस अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. यासाठी बहुजन एकता परिषद आंदोलन करणार असल्याचे नवनाथ पडळकर यांनी सांगितले.