Breaking News

उत्तर भारतात वादळाचे थैमान

नवी दिल्ली : सध्या भारतात हवामानात देशभर बरेच उतार चढाव दिसत आहेत. उत्तर भारतात वादळाने थैमान घातले आहे. मध्य भारतातल्या उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त झाले आहेत, तर मुंबईत मळभ, ऊन आणि उकाड्याने हवामानात बदल झाले आहेत. उष्णतेची लाट आणि वादळाने देशासह महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. येत्या 48 तासांत देशासह राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल नोंदवण्यात येणार आहेत. विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असून, मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी तुरळक सरी कोसळणार आहेत. तर मुंबईत मळभ नोंदविण्यात येणार असल्याने ऊन-सावलीचा खेळ रंगणार आहे.


भारतीय हवामान खात्यानी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांसाठी जळगाव, नांदेड, परभणी येथे उष्णतेची लाट राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद, लातूर, नांदेड येथे पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट कायम आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगड, ओरिसा, तेलंगणा येथे कमाल तापमानाची नोंद 40हून अधिक झाली आहे. राजस्थान आणि जम्मू येथे दाखल झालेले धुळीचे वादळ कायम आहे. छत्तीसगड, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्‍चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश येथे पावसाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासांत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानात वाळूच्या वादळाचा प्रभाव कायम राहील. ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता आहे. मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा येथे पावसाची शक्यता आहे. मध्य भारत, गुजरात, मध्य प्रदेशाच्या तापमानात वाढ नोंदविण्यात येईल. विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेशात उष्णतेची लाट कायम राहील.