Breaking News

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’साठी पुढाकार हवा : आ. कोल्हे

कोपरगाव शहर प्रतिनिधी - जलयुक्त शिवार ही आजमितीला काळाची गरज बनली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यासाठी प्रत्येकाने आपापल्या गावात, शेतात आणि परिसरात जातीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.

याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, माजी जि. प. गटनेते केशव भवर, सरपंच सुनील उकिरडे, उपसरपंच कय्युम पटेल, संचालक फकीर बोरनारे, ज्ञानेश्वर परजणे, आत्मा कमिटीचे सदस्य उत्तम चरमल, बाबासाहेब परजणे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडळ कृषी अधिकारी आदिनाथ आरने, सुनील गावित ,कृषी सहायक सचिन शिंदे आदींसह शिरसगाव परिसरातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. कोल्हे म्हणाल्या, शासनाने सुरु केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा उक्कडगाव ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे लाभ घेतला आहे. त्यामुळे या गावात १०६ शेततळी निर्माण झाली आहेत. तालुक्यातील इतरही गावातील शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. दरम्यान, या अभियानाअंतर्गत कोपरगाव तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये एकूण नऊ गावे निवडण्यात आली आहेत. या गावांतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार तेथे विविध क्षेत्र उपचारांची कामे सुरु आहेत. त्यात कॅपार्मेंट बंडिंग ६८ ( २२३२ हेक्टर ), सीसीटी १ (१० हेक्टर ), नालाखोलीकरण ४, गाळ काढणे ५, विहीर पुनर्भरण ८४, गाब्रीयान बंधारे ७, के. टी. वेअर दुरुस्ती २, बांबू लागवड ४ अशी एकूण १७५ प्रकारची कामे सध्या सुरु आहेत. या कामांवर १ कोटी ९७ लाख खर्च अपेक्षित आहे. शेवटी दीपक राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.