Breaking News

नाणारच्या रिफायनरीला काँग्रेसचा ठाम विरोध - अशोक चव्हाण

रत्नागिरी, दि. 3, मे - विकासाच्या नावावर काँग्रेसने राजकारण करत नसून काँग्रेसचा विकासाला विरोध नाही. मात्र लोकांच्या घरांवर नांगर फिरवून विकास होणार असेल, तर तो नको. सत्तर टक्के लोकांचा प्रकल्पाला विरोध असेल, तर शासनाचा प्रकल्पासाठी आग्रह कशाला, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आज सागवे (ता. राजापूर) येथे काँग्रेसची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. हिंमत असेल, तर रिफायनरी प्रकल्प रद्द करून दाखवा, असे आव्हान सत्ताधार्‍यांना देताना काँग्रेस प्रक ल्पग्रस्तांच्या बाजूने ठामा उभी असल्याची भूमिकाही यावेळी त्यांनी स्पष्ट केली. सध्याच्या भाजप-शिवसेना सरकारचा कारभार म्हणजे ‘वरून कीर्तन अन आतून तमाशा’ असल्याची टीका त्यांनी केली.

सत्तर टक्के लोकांचा विरोधानंतरही रिफायनरी उभारण्याच्या शासनाच्या भूमिकेवर चव्हाण यांनी सडकून टीका केली. इंग्रजांच्या काळामध्ये जेवढी दंडेली झाली नाही तेवढी आता सुरू आहे. ती खपवून घेणार नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाचा अध्यादेश रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा अध्यादेश रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नसून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीला असल्याचा खुलासा केला होता. त्याचा समाचार घेताना लोकशाहीमध्ये हे राज्य सचिवांचे आहे की मुख्यमंत्र्यांचे, असा सवालही श्री. चव्हाण यांनी केला. गेल्या महिन्यात शिवसेनेच्या झालेल्या सभेचा खरपूस समाचार घेताना सभेसाठी लोकांना बाहेरून आणल्याची टीका त्यांनी सेनेवर केली. लढा केवळ तुमचा नसून आमचाही असल्याचे सांगताना नाणार प्रकल्पविरोधी लढ्यामध्ये काँग्रेस लोकांसोबत असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले, माजी मंत्री भाई हातणकर, माजी खासदार मधू दंडवते यांनी विकासाचा पाया घातलेले कोकण उद्ध्वस्त करणार्‍या शासनाला उद्ध्वस्त करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यां च्या जमिनींवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत.’जेटली आणि किटली’ एकत्र येत देश विकण्याचे काम करीत आहेत. प्रकल्पविरोधी लढाई केवळ जमिनीची नसून आपल्या जिंदगीसह भावी पिढीच्या आयुष्याची आहे. त्यामुळे ही लढाई कायम सुरू ठेवा. जमीन तुमचीच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. रिफायनरी प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या प्रशासनाने सुरू केलेल्या कार्यवाहीच्या वेळी सागवे येथील टुकरूल यांनी रस्त्यावर आडवे झोपून प्रशासनाची गाडी अडवून भूसंपादनाला विरोध केला होता. त्यांच्या या कृतीचे काँग्रेसच्या सभेत विशेष कौतुक करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि मान्यवरांनी श्रीमती टुकरूल यांना पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले.