Breaking News

मुलांशी अबोला सोडून, समन्वय ठेवला तर अनुचित प्रकारांना वेळीच आवर घालता येईल -निर्मला चौधरी


अहमदनगर- मुलांशी अबोला सोडून, समन्वय ठेवला तर अनुचित प्रकारांना वेळीच आवर घालता येईल. पालकांनी किशोरवयीन मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करुन, प्रत्येक गोष्ट हितगूज केली पाहिजे. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी मुला-मुलींशी मैत्रीपुर्ण संवाद आवश्यक असल्याचे प्रतिपादन न्यायाधार संस्थेच्या सचिव निर्मला चौधरी यांनी केले.

युवक कल्याण योजने अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे महाराष्ट्र दिनी मुलगी वाचवा... मुलगी शिकवा अभियान राबविण्यात आले. यावेळी अ‍ॅड.चौधरी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बोडखे तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.भानुदास होले, अ‍ॅड.महेश शिंदे, अ‍ॅड.सुर्यभान चौधरी, प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, राष्ट्रीय खेळाडू प्रतिभा डोंगरे, पै.संदिप डोंगरे, निळकंठ वाघमारे, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे, लहानू जाधव, तुकाराम खळदकर, संतोष फलके, दिनेश शिंदे, रोहिदास गाढवे, मयुर काळे, भाऊसाहेब डोंगरे आदि उपस्थित होते.

पुढे निर्मला चौधरी म्हणाल्या की, किशोरवयीन मुलांना वाढत्या वयाबरोबर लैंगिक शिक्षणाबद्दल देखील थोडी जाणीव करुन दिल्यास त्यांच्यामध्ये समजुतदारपणा निर्माण होणार आहे. टिव्ही मालिकांच्या भडक दृश्यांवर स्त्री मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. व्हाट्सअप, फेसबुक, यु ट्युब आदि सोशल मिडीयाचा पगडा युवा पिढीवर होत असल्याने त्यांच्यात नैराश्य, नकारात्मकता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.