Breaking News

हक्काचे पाणी दुष्काळग्रस्तांना मिळायलाच हवे : आ. थोरात ‘निळवंडे कालव्यांसाठी’ भव्य रास्ता रोको

संगमनेर प्रतिनिधी - अनेक अडचणींवर मात करुन निळवंडे धरण पूर्ण केले. कालवे पूर्ण करुन आपणच दुष्काळी भागाला पाणी देणार आहोत. शिर्डी व कोपरगावसाठी गोदावरी खोर्‍यात पाणी आरक्षित आहे. तेथून तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी न्या. दुष्काळग्रस्तांचा एक थेंबही कुठे जाऊ देणार नाही. घोषणा व गाजावाजा न करता तातडीने कालवे सुरु करुन पाणी दुष्काळी भागाला पाणी मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्यावतीने तळेगाव चौफुली येथे भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात उपस्थित कार्यकर्त्यांना करतांना ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात, सभापती निशा कोकणे, शिवाजीराव थोरात, अ‍ॅड. माधवराव कानवडे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, जि. प. सदस्य महेंद्र गोडगे, नवनाथ अरगडे, साहेबराव गडाख, भारत मुंगसे, बाबजी कांदळकर, मच्छिंद्र दिघे, रमेश दिघे, संपतराव गोडगे, अनिल कांदळकर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी आ. थोरात म्हणाले, निळवंडे धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क हा दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा आहे. त्यांच्यासाठी तातडीने कालव्यांची कामे सुरु करा. संगमनेर तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भाग हा प्रर्जन्य छायेत येत आहे. भंडारदरा धरणानंतर निळवंडे धरणाची मंजुरी होती. हे धरण पूर्ण करुन दुष्काळी भागाला पाणी देणे, हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. म्हणून १९९९ मध्ये मंत्रीमंडळात सिनीअर असूनही निळवंडे धरणासाठी पाटबंधारे राज्यमंत्रीपद घेतले. खर्‍या अर्थाने कामाला गती दिली. अनेक अडचणी आल्या. अनेकांनी या कामात खोडा घातला. मात्र मधुकर पिचड यांची मोलाची साथ मिळाली. प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्रवसन केले. तालुक्यातील शासकीय जमिनी दिल्या. त्यावेळी शेजारच्या कोणीही मदत केली नाही. ‘आधी पुनर्वसन मग धरण’ हा आदर्शवत पॅटर्न देशाला दिला. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचा आयटीआय करुन घेवून त्यांना सन्मानाच्या नोकर्‍या दिल्या. काहींनी त्यांना फरशी पुसण्याचे काम देवून हाकलून लावले. आपण काम केलेच. प्रसिध्दी व गवगवा कधी केला नाही. 

यावेळी आ. डॉ. तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, जि. प. सदस्य महेंद्र गोडगे, पाटपाणी समितीचे मच्छिंद्र दिघे, रमेश दिघे, गणपतराव सांगळे, सुभाष सांगळे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, राजू भडांगे यांचीही भाषणे झाली. रामदास वाघ, भाऊसाहेब कुटे, रामहरी कातोरे, विष्णु रहाटळ, प्रभाकर कांदळकर, योगेश सोनवणे, विजय गोडगे, साहेबराव कहांडळ, एकनाथ मुंगसे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, हरिष चकोर, कैलास बाचकर, विलास कवडे, रमेश नेहे, पद्मा थोरात, चंद्रकांत कडलग, सिताराम राऊत, संपतराव डोंगरे, केशवराव मुर्तडक आदींसह हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, पाटबंधारे विभागाच्या श्रीमती संगिता जगताप, रविंद्र बागुल, तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले.