Breaking News

एकेरी वाहतुकबाबत सुधारीत वाहतूक नियोजन जाहीर

सांगली, दि. 28, एप्रिल - महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम (1) (ब) अन्वये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी 25 एप्रिल ते 24 मे रोजीपर्यंत सुधारीत वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रायोगिक तत्त्वावर प्रसिध्द केला आहे. मिरज शहरातील वाहतुकीची कोंडी, नागरिकांची रस्ता सुरक्षा प्रस्थापित होण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांची होणारी गर्दी तसेच होणारे अपघात टाळण्यासाठी सर्व वाहनांना वाहतुकीसाठी एकदिशा मार्ग करण्याबाबतचा सुधारित जाहिरनामा प्रसिध्द केला आहे. 

यानुसार एकेरी वाहतुक मार्ग पुढीलप्रमाणे. हिरा हॉटेल चौक ते मिरज शहर पोलीस ठाणे - हिरा हॉटेल चौक ते मिरज शहर पोलीस ठाणे चौक हा मार्ग एकेरी वाहतूक मार्ग करण्यात येत आहे. मिरज शहर पोलीस ठाणेकडून हिरा हॉटेल चौकाकडे जाणार्‍या दुचाकी खेरीज सर्व वाहने ही मिरासाहेब दर्गा - स्टेशन चौक - हिरा हॉटेल चौक मार्गे वळविण्यात आली होती. परंतु 12 ते 30 ए प्रिलपर्यंत मिरासो दर्गा उत्सव चालू असल्याने पोलीस ठाणे ते स्थानक रोड हा रोड सर्व वाहनांसाठी बंद असल्याने सध्या हिरा हॉटेल चौक ते मिरज शहर पोलीस ठाणे या एकेरी मार्गावरील प्रवेशे सर्व वाहनांसाठी उत्सव कालावधीत खुला राहील व तद्नंतर पुर्वीच्या जाहिरनाम्याप्रमाणेच या ठिकाणी एकेरी मार्ग राहील. बॉम्बे बेकरी ते कमान वेस - बॉम्बे बेकरी ते कमान वेस हा मार्ग एकेरी वाहतूक मार्ग करण्यात आला आहे. मालगांव कडून बॉम्बे बेकरीकडे जाणारी दुचाकी खेरीज सर्व वाहने कमानवेस येथून शासकीय महिला बालसुधारगृह मार्गे शिवाजी पुतळा व पुढे गांधी चौक, मिशन चौक किंवा बॉम्बे बेकरी या मार्गे वळविण्यात येत आहेत.
रेल्वेपुल ते न्यु पुर्वा हॉटेल - रेल्वे पुल ते न्यू पुर्वा हॉटेल पर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली असून न्यू पूर्वा हॉटेल कडून रेल्वे पुलाकडे जाणार्‍या दुचाकी खेरीज सर्व वाहनांना प्रवेशबंद करण्यात आला आहे. न्यू पूर्वा हॉटेलकडून कोल्हापूरला जाणारी वाहने ही न्यू पूर्वा हॉटेल, महात्मा फुले चौकातून उजवीकडे वळून रेल्वे पुलावरून जातील. तसेच रेल्वे पुल वरून न्यू पूर्वा हॉटेल हा एकेरी वाहतूक मार्ग करण्यात आला आहे. नागरिक, रहिवाशी, मोटार वाहन चालकांनी व जनतेने बदल केलेल्या वाहतूक नियोजनास सहकार्य करावे. तसेच आपल्या हरकती, सूचना सहायक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा मिरज किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयास लेखी स्वरूपात पाठवाव्यात. जेणेकरून प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन केल्यानंतर वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.