सरकार सकारात्मक चर्चेसाठी तयार : महाजन
शेतकरी मोर्चाची सरकारने धास्ती घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि पांडुरंग फुंडकर यांना शेतकरी नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी धाडण्यात आले आहे. यापैकी महाजन यांनी सरकार सकारात्मक चर्चेसाठी तयार असून योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मोर्चेकर्यांना दिले आहे. नाशिकवरून 6 मार्चला निघालेल्या किसान सभेचा शेतकरी मोर्चा रविवारी दुपारी मुंबईत दाखल झाला. त्यानंतर भांडूप ऐरोली नाका येथे मोर्चा आला असताना महाजन सामोरे गेले. यावेळी त्यांनी शेतकरी नेते अजित नवले, अशोक ढवळे आणि आमदार जिवा पांडू गावित यांच्याशी चर्चा केली. शेतकर्यांच्या प्रती सरकारच्या भावना सहकार्याच्या आहेत. कष्टकरी बांधवांच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करून त्यामधून मार्ग काढला जाईल. संबंधित विभागाच्या सर्व सचिव आणि अधिकार्यांना तातडीने बोलावून चर्चेने योग्य तो मार्ग काढला जाईल. शेतकर्यांना निराश केले जाणार नाही, असे महाजन यांनी शेतकरी नेत्यांना आश्वासित केले.