Breaking News

बीडमध्ये जलयुक्त शिवार घोटाळा

परळीमध्ये 24 कर्मचार्‍यांवर गुन्हे ; घोटाळा झाला असल्याचा अहवाल कृषी आयुक्तांना सादर 
बीड : जलयुक्त शिवार घोटाळा बीडमधून समोर आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी चोवीस अधिकार्‍यांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

परळी पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलयुक्त शिवार घोटाळा झाला असल्याचा अहवाल कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला होता. 2015-16 या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी 24 कर्मचार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल झाला. परळी तालुक्यातील 307 कामांमध्ये कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी संगनमत करुन बोगस कामे केली. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर 18 कर्मचार्‍यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलं होतं. आता एकूण 24 कर्मचार्‍यांवर फसवणुकीचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. एकूण दोन कोटी 47 हजार 672 रुपयांचा हा अपहार असल्याचं उघड झालं. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी लावून धरली होती. कृषी आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार परळी तालुक्याचे कृषी अधिकारी भीमराव बांगर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अपहार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.