Breaking News

कुकडी चारीवर जेसीबीने माती टाकून पाणी बंद, शेतकर्‍यांकडून हात ओला करण्यासाठी घडतोय प्रकार?

डीवाय 15 चारीला पाण्याचे आवर्तन सुटले आहे. मात्र हात ओले केले नाही की काही तासातच चारीच्या गेटवर मातीचे ढीग टाकून पाणी बंद केल्याचा प्रताप केला जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
सिंचन विभागाकडून पाणी वाटपात दुजाभाव केला जात असल्याने शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पाण्यापासून वंचित ठेवले जाण्याच्या भितीने या प्रकाराबाबत उघडपणे बोलण्यास कोणी धजावत नाही.
डीवाय 15 चारीला पाणी सुरु आहे. या चारीवर कोपर्डी, कुळधरण, राक्षसवाडी आदी भागातील क्षेत्र ओलिताखाली येते. मंगळवारी रात्री या चारीला पाणी आले. शेतकर्‍यांनी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले.चार्‍यांची दुरुस्ती करुन धडपड सुरु केली. शेतात पाणी पोहोचताच गेटवर जेसीबीने माती टाकून पाणी बंद केल्याचा प्रकार कोपर्डीमार्गालगतच्या सुपेकरवस्तीजवळ घडला. पास फाडल्याने हक्काचे पुरेसे पाणी मिळेल असे शेतकर्‍यांनी धारणा होती. मात्र तुम्ही शेताजवळचे खड्डे भरता, बंधार्‍यातही पाणी घेता असे म्हनत रात्रीतून शेतकर्‍यांकडे लक्ष्मीची मागणी करण्यात आली. शेतकर्‍यांनी नकार दिल्याने गुरुवारी पहाटेच जेसीबीने गेटवर माती, मुरुम टाकुन पाणी बंद करण्यात आले. सकाळी पाणी बंद झाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी लक्ष्मीची मागणी करत घरी हेलपाटे मारणार्‍यांना हाकलून लावले.आम्हाला पाणी मिळाले नाही तर पालकमंत्र्यांना कळवून तुमचा बंदोबस्त करु असे म्हणत खडे बोल सुनावल्याने यंत्रणा ताळ्यावर आली. चमकोगिरी करण्यासाठी काहीजण पुढे आल्याचे दिसताच सिंचनच्या लोकांनी जेसीबी बोलावून पाण्याचा मार्ग मोकळा करुन दिला. या प्रकाराने शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मात्र शेतकरी पाण्यापासून वंचित ठेवले जाईल या भीतीने उघड बोलत नाहीत.