Breaking News

पंतप्रधान मोदी विरोधकांचे ऐकत नाही ‘जलपुरूष’ डॉ. राजेंद्र सिंह यांची पंतप्रधानांवर टीका

अहमदनगर : राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पामुळे देशाला मोठा धोका आहे. मात्र यासंदर्भात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आम्ही समजावू शकत होतो. ते मोठ्या मनाचे आहेत आणि विरोधकांना ऐकत होते. मात्र विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांचे ऐकतच नाहीत, अशी टीका डॉ. राजेंद्र सिंह यांनी गुरूवारी केली. ते अहमदनगरला ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलसाक्षरता कार्यशाळेत बोलत होते. 

गंगा जलशुद्धीकरण प्रकल्पावर बोलताना पंतप्रधानांनी निराशा केल्याचा आरोप राजेंद्र सिंह यांनी केला. गंगा जलशुद्धीकरणासाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र दोन टक्केही खर्च झाले नाही, असा गंभीर आरोप राजेंद्र सिंहांनी केला. तसेच, मोदी यांच्याकडून खूप आशा होती, मात्र त्यांनी निराशा केल्याची खंत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना राजेंद्र सिंह यांनी नदीजोड प्रकल्पावर गंभीर आक्षेप घेत, अनेक राज्यात आणि केंद्रात एकहाती सत्ता असूनही नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी झाली नसल्याचे राजेंद्र सिंहांनी निदर्शनास आणून दिले आहे. सतलज, यमुना आणि व्यास प्रकल्पाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही ठिकाणी एकच सरकार असताना शक्य झाले नाही. त्यामुळे राष्ट्रीय नद्या जोड फार दूर आहे. या प्रकल्पाने देशात अपात्कालीन संकटांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारला थांबावे लागेल, असे अवाहन राजेंद्र सिंह यांनी केले. यावेळी राजेंद्र सिंह यांनी जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक केले आहे. जलयुक्त शिवार देशातील सर्वोत्तम योजना आहे. मात्र ठेकेदारमुक्त अंमलबजावणीची गरज त्यांनी व्यक्त केली. जलयुक्त शिवार तीन वर्षांपूर्वी आदर्श योजना होती. मात्र मध्यंतरी ठेकेदारांचा हस्तक्षेप वाढला होता. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने योजना मार्गावर आल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, शेतकर्‍यांनी आता पाण्यानुसार पीक नियोजन करण्याची गरज राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आहे. देशात फक्त महाराष्ट्रातच जलसाक्षरता सुरु असल्याचा त्यांनी आवुर्जन उल्लेख केला. 

जलयुक्त शिवार अभियानाचे कौतुक करुन सिंह म्हणाले राज्यात जलयुक्तचे उत्तम काम झाले आहे. नागरिकांना पाण्याबाबतीत साक्षर करण्याचे काम ही सुरु आहे. शाश्‍वत विकासासाठी या बाबी महत्वाच्या आहेत. यातूनच राज्यासोबत अहमदनगर जिल्हाही पाणीदार होईल पाण्याच्या बाबतीत आपल्याला पडणारा पाऊस, योग्य वापर, पाण्याचा क ाटकसरीने वापर पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पध्दती या बाबी विचारात घ्याव्या लागतील. यामध्ये लोकसहभाग महत्वाचा ठरणार आहे. जिल्हयाला पाणीदार बनविण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.