Breaking News

सिध्दटेकचे विश्रामगृह एकांतवासाच्या वेदनेने व्याकूळ बांधकाम झाले भग्न ; गाद्या, लोड तक्क्यांना कुबट वास

कर्जत तालुक्यातील सिध्दटेक येथील विश्रामगृहाची वापराविना दयनिय अवस्था झाली आहे. सिद्धिविनायक मंदीराच्या पश्‍चिमेला बांधलेले विश्रामगृह भग्न झाले असुन त्यातील साहित्याची मोडतोड झाली आहे. देखरेखीच्या अभावामुळे लाखो रुपये खर्च करून बांधलेली भव्य इमारत हळूहळू कोसळू लागली आहे. सिध्दटेकची व्यथा थांबायलाच तयार नसून कामासाठी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी फक्त पगारापुरतेच उरल्याचे चित्र दिसत आहे. विविध भागातुन येणारे अधिकारी, पदाधिकारी, मंत्री आदी मान्यवरांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी हे विश्रामगृह बांधण्यात आले. मात्र त्याची आजमितीची परिस्थिती पाहता वापर करणे दुरापास्त झाले आहे.


जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे त्याची बिकट अवस्था झाली आहे. सभोवती काटेरी झाडे झुडपे वाढली असुन परिसर ओसाड बनला आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हे विश्रांतीगृह नेहमीच कुलुपबंद असते. मान्यवरांच्या आरामदायी विश्रांतीसाठी येथे शासनाकडून कॉट, गाद्या, खुर्च्या, टेबल आदी साहित्य पुरविण्यात आलेले आहे. परंतु वापराविना त्याची दयनीय अवस्था झाली आहे. फर्निचर तसेच खिडक्या दरवाजांची मोडतोड झालेली आहे. गाद्या, उशा यांचा कुबट वास सुटला आहे.अनेक वर्षे हे विश्रांतीगृहात कोणी वास्तव्यास राहिले असल्याच्या पाऊलखुणा मिळत नाहीत. सिद्धटेकच्या विकासाला चालना देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. येथील परिसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने त्यावर ग्रामपंचायतीचा अधिकार चालतो. नियोजन व विकास समिती अशा गोंडस नावाखाली शासनाने समिती स्थापन केली. प्रांताधिकारी अर्चना नष्टे समितीच्या अध्यक्ष आहेत. समितीच्या विविध बैठका होतात. त्यामध्ये विकासावर चर्चाही होते, ठरावही संमत होतात, परंतु अंमलबजावणीचीच बोंब असल्याने सिद्धटेक बकाल होत चालले आहे. बांधकाम विभागाने लक्ष घालुन योग्य देखरेख केल्यास इमारतीचा सदुपयोग होवू शकेल. मात्र तशी अधिकार्‍यांची मानसिकता असताना दिसत नाही हे दुर्दैव आहे.

दुर्लक्षामुळे इमारत होतेय भग्नजिल्हा परिषद तसेच विकास समितीच्या भोंगळ कारभारामुळे सिद्धटेक देवस्थान परिसराला अवकळा आली आहे. लाखो रुपये खर्च करुन बांधलेले येथील विश्रांतीगृह दिवसेंदिवस भग्न होत आहे. येथील बांधकामात वड, पिंपळ, सुबाभुळ अशी झाडे वाढू लागल्याने इमारत भग्न होत असून तडे जावु लागले आहेत. इमारतीचा वापर नसताना टाकीतील अतिरिक्त पाणी इमारतीत शिरत असल्याने इमारत जिर्ण झाली असुन अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. शासकिय यंत्रणा येथे कार्यरत असल्याचेे कसलेच संकेत येथील परिस्थिती पाहता मिळत नाहीत.

भक्तनिवासात भाविकांची अधिक सोयश्री क्षेत्र सिद्धटेक येथे भाविकांसाठी प्रशस्त असे भक्तनिवास बांधलेले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित योगराज लॉजिंग अ‍ॅन्ड गार्डनचे संचालक हेमंत मगर यांचेकडून भाविकांना शासकिय दराने सुविधा पुरविल्या जातात. सिंगल बेड, डबल बेड, हॉल अशा सुविधा आहेत. फोन करुनही बुकिंगची सोय उपलब्ध असल्याने भाविकांना ते सोयीचे ठरत आहे. शासकीय विश्रांतीगृहात मात्र असुविधा वास्तव्य करीत आहेत.