हजारो लिटर स्वच्छ पाण्याची होतेय नासाडी पालिका प्रशासनाची डोळेझाक
दरम्यान, शहरात आणि अन्य ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. पालिका प्रशासनाने पाण्याची होणारी गळती थांबवण्याची साधी तसदीही घेतलेली नाही. या जलवाहिनीतून निघणारे स्वछ पाणी रस्त्यालगतच्या गटारीत जात आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यास सुरवात झाली आहे. मागील दोन तीन वर्षांत महाराष्ट्रातील अनेक भागांत पाण्यासाठी रक्ताचे पाणी करण्याची वेळ आली होती. नागरिकांना पाण्यासाठी ठिकठिकाणी भटकंती करण्याची वेळ आली. शहराच्या उत्तर भागात पालिका हद्द संपते, त्या दरम्यान गोंधवनी रस्त्यालगत भुयार गटार योजनासदृश्य पाइपमधून मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अविरत स्वच्छ पाण्याचा प्रवाह सुरु आहे. विशेष म्हणजे भुयार गटार योजना अजून कार्यान्वितही झालेली नसताना पाईपमधून स्वच्छ पाण्याचा प्रवाह सातत्त्याने सुरु आहे. नगरपालिकेतर्फे पाण्याची बचत करण्याचे नागरिकांना वारंवार आवाहन केले जाते. मात्र नगरपालिकेच्या हलगर्जीमुळे पाण्याची नासाडी होत आहे.
