Breaking News

एक जिल्हा एक शिव जन्मोत्सवः नाशिकसह सहा जिल्हे देणार रयतेच्या राजाला वैश्‍वीक मानवंदना


नाशिक/प्रतिनिधी ;- जगात युध्द कौशल्य निती आणि व्यवस्थापन गुरू म्हणून ख्याती असलेले राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नाशिक, संभाजीनगर,सांगली आदी सहा जिल्ह्यांनी एक जिल्हा एक शिव जन्मोत्सव ही संकल्पना उचलून धरल्याने या जिल्ह्यांतील सर्व धर्म पंथीय शिव प्रेमी एकाच वेळी बहुजन रयतेच्या राजाला मानवंदना देणार आहेत. विशेषतः नाशिक जिल्ह्याने या मानवंदना सोहळ्याचे विशेष नियोजन केले असून अनंत कान्हेरे मैदानवर सकाळी 9 वा. लाखो लोक प्रजा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विश्‍व विक्रम प्रस्थापीत करणार आहेत. या मानवंदना सोहळ्याची दखल गिनिज बुक आफ रेकार्डने दखल घेतली असून त्यांचे पथक शहरात दाखल झाले आहे.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म तिथीवर घोळ घालून बहुजनांमध्ये फुट पाडणार्‍या मनुवादी विचारसरणीला सनसनीत चपराक ठरणारी यंदाची शिव जयंती ऐतिहासिक ठरणार आहे. गेली कित्येक वर्ष सुरू असलेला तिथी आणि तारखेला वादही या निमित्ताने संपुष्टात आला असून 19 फेब्रूवारी हाच छत्रपतींचा जन्म दिवस निश्‍चित करून या दिवशी महाराष्ट्रभर एकच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय तमाम शिव प्रेमींनी घेतला आहे.


केवळ एक दिवस शिव जयंती साजरी न करता वर्षभर वेगवेगळ्या प्रसंगाचे औचित्य साधून छत्रपतींचे विचार समाजात पेरण्याचा संकल्पही या निमित्ताने शिवप्रेमींनी घेतला आहे. म्हणूनच शिव जयंती नव्हे तर शिव जन्मोत्सव असे या सोहळ्याचा नामोल्लेख प्रचलीत करण्यात आला असून यंदापासून एक जिल्हा एक शिव जन्मोत्सव अशी संकल्पना नाशिक जिल्ह्याने मांडली. मराठा बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून यावर झालेल्या मंथनानंतर महाराष्ट्रातील औरंगाबाद, सांगलीसह अन्य सहा जिल्ह्यांनीही ही संकल्पना उचलून धरली आणि पारंपारीक शिव मिरवणूकीतील बिभत्स प्रकार टाळून सकाळी नऊ वाजता शिव पालखी सोहळ्याची शाही मिरवणूक काढण्याचा निर्णय एकमताने झाला आहे.

शिव पालखी मिरवणूक सोहळ्या पुर्वी खुल्या मैदानावर शिवप्रेमींनी एकञ येऊन आपल्या राजाच्या किर्तीसमोर नतमस्तक होऊन छत्रपतींना मानवंदना देण्याचा निर्धार आहे.नाशिक जिल्ह्याने यासाठी विशेष नियोजन केले असून शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर जिल्ह्यातील सर्व धर्म पंथीय शिव प्रेमी एकत्र येऊन बहुजन प्रतिपालक छत्रपतींना अभिवादन करणार आहे. या अभूतपुर्व सोहळ्याची दखल घेऊन विश्‍व विक्रम नोंदविण्यासाठी गिनिज बुक आफ रेकार्डचे पथकही जातीने हजर राहणार आहे. मानवंदना सोहळा संपन्न झाल्यानंतर शिव पालखीची भव्य शाही मिरवणूक सकाळी 9 वा. निघेल. मिरवणूक संपल्यानंतर जिल्ह्यातील शिवप्रेमी आपआपल्या गावात स्वतंत्रपणे महाराजांचा जन्म दिन सोहळा करतील. अन्य जिल्ह्यांमध्येही जवळपास ही रूपरेषा असून या वर्षीपासून शिवराय ते भीमराय जन्मोत्सव सोहळा संपन्न नवा स्तुत्य पायंडा पाडला जाणार आहे.