विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या निधनाने राजकीय-सामाजिक क्षेत्रातील एक निरलस, निष्कलंक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, प्रा. फरांदे हे एक ध्येयवादी अध्यापक, चिंतनशील अभ्यासक, अभ्यासू वक्ते आणि चौफेर प्रतिभेचे साहित्यिक होते. सामाजिक बांधिलकीपोटी ते राजकारणात सक्रिय झाले. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यभर फिरून पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले. अगदी शेवटच्या स्तरावरील कार्यकर्त्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. प्राध्यापकांच्या संघटनांसह विविध साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय योगदान देतानाच प्रा. फरांदे यांनी कृषी, सहकार आणि जलसंधारण क्षेत्रात मोलाचे कार्य केले. विशेषत: कृषी विद्यापीठाचे काम अधिकाधिक शेतकरीभिमुख करण्यासाठी त्यांनी जाणीवेने प्रयत्न केले. विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात प्रारंभी सदस्य, पक्षाचे उपनेते, उपसभापती आणि सभापती पद भूषविताना आपल्या विनयशील कार्यपद्धतीने ते साऱ्यांच्याच आदरास पात्र ठरले होते.
निरलस, निष्कलंक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व हरपले - मुख्यमंत्री
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:30
Rating: 5