Breaking News

सोहराबुद्दीन शेख प्रकरणाच्या याचिकेवर आज सुनावणी


मुंबई : गुजरातमधील कथित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील जनहित याचिकेवरील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. सोहराबुद्दीन शेख प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या निकालाच्या विरोधात मुंबईतील वकिलांच्या संघटनेने याचिका दाखल केली होती. नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसर बी यांचे अपहरण करून गुजरात पोलिसांनी त्यांची हत्या करुन ही चकमक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे चकमकीतील एकमेव साक्षीदार तुलसीराम प्रजापतीची याचीही गुजरात पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप आहे.

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी अमित शाह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सीबीआयविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अमित शाह यांना या खटल्यातून आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान न देण्याचे ठरवल्याने सीबीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वकिलांची एक संघटना बॉम्बे लॉयर्स असोसिएशनच्यावतीने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली. हायकोर्टाने सीबीआयला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी होणार आहे.

वकिलांच्या याच संघटनेच्यावतीने जस्टिस लोया यांच्यामृत्यूसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. लोया यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली. या याचिकेवरही मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सूर्यकांत लोकरे यांनी दाखल केलेली याचिकाही सुनावणीसाठी स्वत:कडे वर्ग करून घेतली आहे.